बीड : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसला (Congress) जबर धक्का दिला आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी (Rajkishor Modi) यांनी गुरूवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेली अनेक वर्षे मोदी यांनी अंबाजोगाईत (Ambajogai) काँग्रेसचा गड भक्कमपणे सांभाळलेला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.
मागील ३५ वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रीय असताना राजकिशोर मोदी यांनी एनएसयुआय, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, प्रदेश संघटनेसह विविध महामंडळे व समित्यांवर काम केले आहे. २० वर्ष त्यांनी येथील नगर पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व राखले आहे. दोन वेळा विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव पुढे आले होते. परंतु, संधी मिळाली नाही.
दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत बाबूराव आडसकर, विद्यमान मंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख यांचे ते खंदे समर्थक मानले जातात. पक्षांतर्गत कुरघोड्यांमध्ये ते नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीची साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
गुरूवारी मोदी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अंबाजोगाईमध्ये मोदी यांनी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व मागील अनेक वर्षांपासून कायम ठेवले होते. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने काँग्रेसची ताकद आणखी कमी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात काँग्रेसला उतरती कळा लागली. मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नव्हता. काँग्रेसवर पहिल्यांदाच ही नामुष्की ओढवली होती. आता पक्षांतर्गत कुरघोडी फटका पक्षाला बसू लागला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.