Aurangabad Gram Panchayat : ठाकरेंच्या आव्हानानंतर शिरसाटांची शिवसेनेला धोबीपछाड

Aurangabad Gram Panchayat |बंडखोर गद्दार विरुद्ध निष्ठावंत शिवसेना अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली.
Sanjay Shirsath
Sanjay ShirsathSarkarnama

औरंगाबाद : राज्यात शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटातील आमदारांना 'राजीनामा देऊन निवडून या,' असे आव्हान शिवसेना नेते (shiv sena), माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट आमदारांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा बाजी मारली आहे. (aurangabad gram panchayat news update)

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या वडगाव- बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज झाली. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. बंडखोर गद्दार विरुद्ध निष्ठावंत शिवसेना अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली. वाळुज एमआयडीसी क्षेत्राचा काही भाग या ग्रामपंचायतीमध्ये येत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या देखील ही निवडणूक चारही पक्षांसाठी महत्त्वाची होती.

शिवसेनेत असताना संजय शिरसाट यांची या ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता होती. गेल्यावेळी 17 पैकी 16 सदस्य हे संजय शिरसाठ यांना मानणारे होते. राज्यातील सत्तांतर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेले बंड या पार्श्वभूमीवर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीकडेही राज्यातील जनतेचा कल म्हणून पाहिले गेले.

शिरसाठ यांना पाच जागांचा फटका बसला असला तरी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यात त्यांना यश आले आहे. आज जाहीर झालेल्या निकालानुसार संजय शिरसाठ यांच्या पॅनलला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या तर शिवसेनेच्या निष्ठावंत पॅनलला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. दोन जागा भाजपच्या पॅनलला मिळाल्या.

Sanjay Shirsath
Aurangabad Gram Panchayat : बंडखोरीनंतरही भुमरे यांचा करिष्मा कायम

चौरंगी लढत होईल, अशी अपेक्षा असताना ही तिरंगी लढत झाली. बाळासाहेब सानप आणि जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांच्या पॅनलला मात्र सपशेल अपयश आले. संजय शिरसाठ यांनी वडगाव -बजाज नगर ग्रामपंचायत आपल्याकडे राखत वर्चस्व सिद्ध केले आहे. ही जरी ग्रामपंचायतची निवडणूक असली तरी देखील संजय शिरसाट यांचे नेतृत्व अजूनही कायम आहे यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महत्त्वाची मानली जात होती.

पहिल्यांदाच या निवडणुकीत शिवसेनेने सर्व शक्ती पणाला लावली होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , आमदार अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत,तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्यासह माजी महापौर व जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी मैदानात उतरले होते. निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशा पद्धतीचा प्रचार या निवडणुकीत करण्यात आला होता.

शिंदे गटविरुद्ध शिवसेना या लढाईत भाजपने देखील आपले पॅनल दिले होते. तिरंगी लढत असताना शिरसाट यांनी वडगाव बजाज नगर ग्रामपंचायत राखल्यामुळे शिंदे गटाची सरशी झाली असे म्हणावे लागेल. संजय शिरसाठ गेल्या पंधरा वर्षापासून औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बजाज नगर वडगाव या भागाने त्यांना सातत्याने निवडणुकीत मताधिक्य दिलेले आहे. त्यामुळे शिरसाठ यांचे देखील या ग्रामपंचायत व आसपासच्या भागावर विशेष लक्ष होते.

आमदार निधी व राज्यातील इतर योजनांच्या माध्यमातून शिरसाट यांनी गेल्या पंधरा वर्षात या भागात अनेक विकास कामे केली आहेत. या विकास कामांमुळेच मतदारांनी शिरसाट यांनी बंडखोरी, गद्दारी केली याकडे दुर्लक्ष करत काम पाहून मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने संपूर्ण ताकद लावून देखील त्यांना चार जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेना कुठे कमी पडली याचा विचार स्थानिक नेत्यांना करावा लागेल. भाजपने दोन जागा मिळवत ग्रामपंचायत केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com