Aurangabad : बालेकिल्ल्यातील सात पैकी पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत...

शिवसेनेची सत्ता आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना झालेले हे बंड राज्याच्या राजकारणात भूकंप ठरू पाहत आहे, त्या भुकंपात बसणाऱ्या तड्यांमध्ये औरंगाबाद आणि मराठवाड्याचा मोठा हातभार लागणार आहे. (Shivsena)
Shivsena Mlas With Eknath Shinde In Surat
Shivsena Mlas With Eknath Shinde In SuratSarkarnama

औरंगाबाद : मराठवाड्यातील शिवसेना स्थापनेपासून मजबुत पकड असलेल्या औरंगाबादचा बालेकिल्ला आता ढासळला आहे. (Shivsena) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाल्यानंतर शिवसैनिक चवताळून कामाला लागले होते. (Aurangabad) लोकसभेतील पराभवाचा डाग धूवन टाकतांना जिल्ह्यात सर्वाधिक सहा आमदार निवडून आणत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली होती.

शहरातून शिवसेनेचे संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, तर जिल्ह्यात वैजापूरमधून प्रा. रमेश बोरनारे, कन्नड उदयसिंह राजपूत, पैठण संदीपान भुमरे तर सिल्लोडमधून अब्दुल सत्तार हे विजयी झाले होते. (Marathwada) तर त्यानंतर झालेल्या जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज मतदारसंघातून अंबादास दानवे हे विक्रमी मतांनी निवडून आले होते. त्यामुळे संपुर्ण जिल्हा शिवसेनामय झाला होता.

योगायोगाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि जिल्ह्याला कधी नव्हे ते दोन मंत्री मिळाले. भुमरे हे कॅबिनेट तर नव्यानेच शिवसेनेत दाखल झालेले सत्तार राज्यमंत्री झाले. परंतु हा आनंद एकनाथ शिंदे यांच्या बंडाने हिरावला गेला आहे. नगरविकास आणि रस्ते विकास महामंडळासारखे महत्वाचे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यापेक्षाही जास्त महत्व आणि जवळीक जिल्ह्यातील आमदार आणि मंत्र्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी होती.

भुमरे, सत्तार, राजपूत, बोरनारे यांना निधी देतांना शिंदे यांनी देखील कधी हात आखडता घेतला नाही. परिणामी एकनाथ शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसले तेव्हा जिल्ह्यातील सात पैकी पाच आमदार आणि मंत्र्यांनी त्यांना बळ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील व मराठवाड्यातील शिवसेनेचे जवळपास सर्वच आमदार सुरतमध्ये गेल्याचे बोलले जात होते.

दुपारपर्यंत यातील काही नाव गळाली, त्यात कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत आणि विधान परिषदेतील आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे मुंबईतच असल्याचे स्पष्ट झाले. पक्षनेतृत्वाने त्यांना फोन बंद करून ठेवायला सांगितल्यामुळे संपर्क होत नव्हता. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आमदारांच्या बैठकीत अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, कळमनुरीचे संतोष बांगर हे उपस्थितीत होते.

शिवसेनेच्या जिल्ह्यातील सात पैकी पाच आमदार त्यात दोन मंत्र्यांनी शिंदे यांना दिलेली साथ हा मोठा धक्का समजला जातोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव वगळता कधी मोठा पराजय कधी शिवसेनेला पहावा लागला नव्हता. कवेळ लोकसभा, विधानसभाच नाही तर महापालिका, जिल्हा परिषदेत देखील शिवसेना कायम सत्तेत राहिलेली आहे.

शिवसेनेची सत्ता आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना झालेले हे बंड राज्याच्या राजकारणात भूकंप ठरू पाहत आहे, त्या भुकंपात बसणाऱ्या तड्यांमध्ये औरंगाबाद आणि मराठवाड्याचा मोठा हातभार लागणार आहे ही धक्कादायक बाबच म्हणावी लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com