शिवसेनेच्या 'त्या' उपकाराची ममतांकडून परतफेड : राष्ट्रवादी-काँग्रेसचाही जीव भांड्यात

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर
Mamata Banerjee & Aditya Thackeray
Mamata Banerjee & Aditya ThackeraySarkarnama

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. त्यापुर्वी ममता बॅनर्जी यांनी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या या दोन्ही नेत्यांनी ममतांना विविध भेटवस्तू देवून त्यांचे स्वागत केले. ममतांनीही बंगालच्या काही खास वस्तू महाराष्ट्राला भेट दिल्या. याच दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेच्या भुतकाळातील एका उपकाराचीही आठवणीने परतफेडही केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्या मागील कारणांची चर्चा रंगली होती. पश्चिम बंगलमधील तिसऱ्या मोठ्या विजयानंतर ममता यांनी पंतप्रधान बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसची ताकद पुरेशी नसल्याची टीकाही अनेकदा स्वतः ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यामुळेच आता ममता यांना राष्ट्रीय राजकारण खुणावत असल्याचे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर ममतांनी बंगालच्या बाहेरील गोवा, त्रिपूरा, मेघालय अशा राज्यांमध्ये आपली ताकद उभी करायला सुरुवात केली आहे.

Mamata Banerjee & Aditya Thackeray
दिदींच्या पंतप्रधान पदाचा रस्ता महाराष्ट्रातून? की राज्यात ताकद उभी करण्याचा प्रयत्न?

त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर ममता महाराष्ट्रात आपली ताकद उभी करणार आहेत का? अशा चर्चांना सुरुवात झाली होती. महाराष्ट्रात आगामी काळात मुंबईसह जवळपास दिड डझन महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकाणात उभे राहण्यासाठी ममता महाराष्ट्रात जमीन तयार करत आहेत का? असा सवाल त्यांच्या दौऱ्यावरुन विचारला गेला. तसेच महाराष्ट्रात ताकद उभी करुन राष्ट्रीय राजकारण करण्याची त्यांची रणनिती असल्याचेही बोलले गेले. पण या सगळ्यावर ममतांनी तृणमूल काँग्रेस महाराष्ट्रात येणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे.

Mamata Banerjee & Aditya Thackeray
७३४ दिवसांच्या आंदोलनापुढे भाजप सरकार नमले : आणखी एक कायदा मागे

याबाबत पत्रकारांनी ममता यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, तृणमूल महाराष्ट्रात येत नाही. जिथे जिथे प्रादेशिक पक्ष चांगले काम करत आहेत, भाजपसमोर ताकदीने उभे आहेत तिथे आम्ही शिरणार नाही. तिथे आमच्या प्रादेशिक मित्रांनाच आम्ही साथ देणार असल्याचे त्या म्हणाल्या. काँग्रेससोबत बिनसल्याने ही साथ शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आहे हे ममतांच्या बोलण्यावरुन स्पष्ट आहे. ममतांनी या घोषणेतून शिवसेनेच्या बंगालमधील पाठिंब्याच्या उपकाराचीही परतफेड केली आहे.

बंगालमध्ये यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेनेने आपले प्रत्यक्ष उमेदवार न उतरवता, तृणमूल काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला होता. त्यानंतर आता तृणमूलनेही महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा जाहिर केल्याने त्यांनी एक प्रकारे सेनेच्या त्या उपकाराचीही परतफेड केली आहे. सोबतच त्यांच्या तृणमूल महाराष्ट्रात येणार नसल्याच्या घोषणेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचाही जीव भांड्यात पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com