मुंबई: अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangna Ranout) स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. '1947मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं आहे.' या वक्तव्यामुळे देशभरातून तिच्यावर टिका होत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध नोंदवला आहे, ''लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है,''अशा शब्दात नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. याचवेळी त्यांनी कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणीही केली आहे.
पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी ही मागणी केली आहे. '' 1857 पासून या देशात स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली. या लढाईत लाखो लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. महात्मा गांधींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. पण खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य तर मध्ये भीक मागून मिळाले होते. हे सांगण्यासाठीच ज्या लोकांनी यांना पद्मश्री मिळवून दिली त्यांनीच यांना पुढे केलं आहे. पण हा गांधीजींपासून अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. 1947चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले, असे ज्या प्रकारे सांगितले जात आहे, त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान झाला आहे, केंद्र सरकारने कंगनावर गुन्हा दाखल करून पद्मश्री परत घ्यावा, अशी मागणी यावेळी नवाब मलिक यांनी केली आहे.
तसेच, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनीही कंगणाच्या या बेताल वक्तव्याचा निषेध केला होता. 'कंगना राणावतचे वक्तव्य केवळ महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचाच नव्हे तर सरदार भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांच्या बलिदानाचाही अपमान आहे. आता 'पंतप्रधानांनी आपले मौन तोडून देशाला सांगावे की ते कंगना राणावतच्या या मताचे समर्थन करतात का. तसे न केल्यास सरकारने अशा लोकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनीही कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. "कंगना राणावतने आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्यामुळे तिने सर्व देशवासीयांची माफी मागावी, अशी माझी मागणी आहे." महात्मा गांधी, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, सरदार भगतसिंग यांचा अपमान करणाऱ्या महिलेकडून भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा. अशी मागणी केली. इतकेच नव्हे तर, 'अशा लोकांना पद्मश्री देणे म्हणजे सरकार अशा लोकांना प्रोत्साहन देत आहे,' असे म्हणत त्यांनी केंद्रसरकारवरही टिकास्त्र डागले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.