दुष्काळ जाहीर करण्यासाठी सोनगीरमध्ये शेतकर्‍यांचा एल्गार

येथे गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडला आहे. परिसरातील सर्व तलाव, धरण, विहिरी कोरडे पडले आहे. पावसाच्या उरल्या सुरल्याअपेक्षा देखील नष्ट झाल्या आहेत. सोनगीर कृषी मंडळ विभागांतर्गत सोनगीरसह दापुरा, दापुरी, धनूर, सरवड, कापडणे आदी गावांचा समावेश होतो. या परिसरात सरासरी 20 टक्के पाऊस झाला आहे. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी सोनगीरमध्ये शेतकर्‍यांचा एल्गार

सोनगीर (जिल्हा धुळे) : पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे तरी येथे व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरीवर्गासह सर्वच हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दोनदाच हलका पाऊस झाला. भयावह दुष्काळ असूनही तसे जाहीर केले जात नाही. पिक विमा काढला असूनही कंपनीतर्फे पीक परिस्थिती पहाणी केली जात नाही म्हणून येथील शेतकर्‍यांनी दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे व पीक विमा मंजूर झाला पाहिजे अशा घोषणा देत एल्गार पुकारला.

कृषी विभागाने सोनगीर मंडळ अंतर्गत खरीप पिकांची स्थितीची यापूर्वीच पहाणी केली. त्यावेळी सर्व पिके नष्ट झाल्याचे व आता पाऊस पडून ही पिके येण्याची शक्यता मावळली असल्याचे सांगितले. मात्र तरीही विमा कंपनीने पीक पहाणी न केल्याने नाराज शेतकर्‍यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोषणा दिल्या.

येथे गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडला आहे. परिसरातील सर्व तलाव, धरण, विहिरी कोरडे पडले आहे. पावसाच्या उरल्या सुरल्याअपेक्षा देखील नष्ट झाल्या आहेत. सोनगीर कृषी मंडळ विभागांतर्गत सोनगीरसह दापुरा, दापुरी, धनूर, सरवड, कापडणे आदी गावांचा समावेश होतो. या परिसरात  सरासरी 20 टक्के पाऊस झाला आहे. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते. गेल्या महिन्यात मंडल कृषी अधिकारी पी. ए. पाटील, कृषी सहाय्यक एस. डी. भदाणे, व्ही. जी. पाटकर यांनी केलेल्या पहाणी नुसार कापूस, भुईमूग, ज्वारी, बाजरी तसेच फळबागेतील आवळा, बोर आदींचे उत्पादन येण्याची शक्यता मावळली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान मंडल कृषी अधिकारी पाटील यांनी पीक पहाणी करण्यासाठी रिलायन्सच्या विमा कंपनीचे अधिकारी येत असून मंडळातील शेतकर्‍यांनी जमावे अशा सुचना कृषी विभागातील कनिष्ठ अधिकारींना दिल्या.

मात्र रिलायन्सचे अधिकारी आले पण पीक पहाणी करण्यासाठी नव्हे तर उडद पीकाचे प्लाॅट पहाण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंडळ अंतर्गत उडदाचे केवळ दोनच प्लाॅट आहेत. पीक पहाणी होणार नसल्याचे स्पष्ट होताच जमलेले शेतकरी संतप्त झाले. त्यांनी पीक पहाणी झालीच पाहिजे असा आग्रह धरला. शेवटी घोषणाबाजी केली. पीक पहाणीच्या निमित्ताने उपस्थित कृषी सहाय्यक (देवभाने) के. एस. खैरनार, सोनगीरचे व्ही. जी. पाटकर, नंदाणेचे एस. डी. भदाणे, रिलायन्स कंपनीचे वाय. व्ही. अवघडे, डी. पी. महाजन यांनी संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढली.

यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष आर.के.माळी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, शेतकरी प्रभूदास गुजर, दिनेश बडगुजर, एस. एस. पाटील, मनोहर गुजर, यादव माळी, राजूलाल माळी, गिरीश गुजर, सुभाष गुजर, प्रकाश गुजर, मोहन परदेशी, गोपाल माळी, हेमंत माळी आदी उपस्थित होते. त्यांनी सोनगीर परिसर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी केली. दरम्यान पाऊस नसल्याने पिण्याच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com