कराड : कोरोना विरोधात टाळी, थाळी आणि आता दिवाळी अशी त्रिसूत्री नरेंद्र मोदींनी लोकांसमोर मांडली आहे. ती अतिशय दुर्दैवी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा टीव्हीसमोर येऊन स्वगत व्यक्त करताना पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता सर्व भारतीयांनी घरात अंधार करून दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. मागील १५ दिवसाच्या कालावधीत प्रधानमंत्री मोदी यांचे हे तिसरे भाषण असून प्रत्येकवेळी कोरोना विषाणूच्या विरोधात काहीतरी नवीन जुमला लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय.
आज सकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी कोरोना संसर्गाविषयीचे आकडे, आरोग्य व्यवस्थेची तयारी, लाखो स्थलांतरित मजुरांचा गंभीर प्रश्न, अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने रोजगारावर होणारे परिणाम या सर्व मुद्द्यांना स्पर्श न करता दिवे लावण्याचे आवाहन केले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करताना आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एकमेव जागतिक नेते (राष्ट्रप्रमुख किंवा शासन-प्रमुख) आहेत की ज्यांनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी ०१ ते ३१ मार्च या कालावधीत २८ तर युकेचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी आजारी पडण्याआधी १८ पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना म्हणजेच पत्रकारांच्या माध्यमातून आलेल्या जनतेच्या प्रश्नांना नियमितपणे सामोरे गेले आहेत. देश एवढ्या गंभीर परिस्थितीतून जात असतानादेखील कार्यालयात बसून अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले भाषण वाचून एकतर्फी संवाद साधण्यापेक्षा पत्रकार परिषद घेवून देशवासीयांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनी टाळी, थाळी आणि आता दिवाळी अशी त्रिसूत्री लोकांसमोर मांडली आहे हे अतिशय दुर्दैवी आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.