थेट सरपंच निवड रद्द !

थेट सरपंच निवड रद्द !

मुंबई : थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक मंगळवारी (ता.25) विधीमंडळात मंजूर करण्यात आले. शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावर विरोधकांनी केलेल्या गोंधळात विधानसभा आणि विधान परिषदेत राज्य सरकारने हे विधेयक मांडले आणि मंजूरही करुन घेतले.

त्यामुळे राज्यात यापुढे सरपंच पदासाठी थेट निवडणूक न होता ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच निवडले जातील.

फडणवीस सरकारने जुलै 2017 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सत्तांतरानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने हा निर्णय फिरवला. 28 जानेवारीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत थेट सरपंच निवड रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानाद्वारेच सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तत्काळ लागू करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश जारी करण्याची विनंती राज्यपालांना केली होती.

 मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यादेश काढण्यास नकार दिला. तसेच विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडून ते मंजूर करावे, असा सल्ला राज्यपालांनी ग्रामविकास विभागाला दिला होता. त्यामुळे राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात यासंदर्भातील विधेयक मांडले.

 मात्र, शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावर विरोधक विधानसभा आणि विधान परिषदेतही आक्रमक होते. विरोधकांच्या गोंधळ, घोषणाबाजीत राज्य सरकारने शासकीय कामकाज उरकून घेतले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अधिनियम 2020 हे विधेयक मांडले. विरोधकांच्या गोंधळातच विधानसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले.

 त्यानंतर विधान परिषदेतही विरोधकांच्या गोंधळात हे विधेयक मांडण्यात आले आणि ते मंजूरही करण्यात आले. त्यानुसार आता राज्यात यापुढे ग्राम पंचायतीसाठी ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या सदस्यांकडून, त्यांच्यामधून पंचायतीचा सरपंच निवडून देण्यात येईल अशी तरतूद लागू झाली आहे.
पुढील महिन्यात राज्यात दीड हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

 त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने वेगवान हालचाली करीत अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी हे विधेयक विधीमंडळात मांडून त्याला मंजुरीही घेतली. ज्यामुळे राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये थेट सरपंच निवडी होणार नाहीत, त्याऐवजी ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचांची निवड होणार आहे. राजकीय लाभापोटी फडणवीस सरकारने थेट सरपंच निवडी करण्याचा निर्णय घेतला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com