अकोला : भारिप-बहुजन महासंघात राहून तीस वर्षे विविध पदांवर सत्ता भोगली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख ते आमदारांपर्यंती पदे उपभोगली, तेव्हा पक्षात विश्वासाहर्ता नव्हती का, अशा संतप्त प्रतिक्रिया दोन माजी आमदारांच्या राजीनाम्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये उमटल्या आहेत.
भारिप-बमसं व वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी पक्षांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत राजीनामे दिले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर उभी फुट पडल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर ‘वंचित’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दोन्ही आमदारांच्या कृतीला बेईमानीचा नवा अध्याय असे संबोधले आहे.
''३० वर्षे सत्ता आणि पदे मिळाली, १० वर्षे आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सभापती, लोकसभा उमेदवारी, जिल्हाध्यक्ष पदासहीत सर्व काही मिळविले आणि आता पक्षाच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय असल्याचे पातोडे म्हणाले. विधानसभा निवडणुकीत व जिल्हा परिषद निवडणुकीत उघड-उघड पक्षाच्या विरोधात उमेदवार पाडण्यासाठी फिरणाऱ्या दोन्ही माजी आमदारांनी स्वतःची विश्वासाहर्ता तपासून घेतली पाहीजे. पक्षाचा विश्वास संपला असता तर दोन्ही माजी आमदारांची उघड बेईमानी यशस्वी झाली असती. स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सत्ता मिळाली नसती. त्यामुळे पक्षाची नव्हे तर दोन्ही माजी आमदारांची विश्वासाहर्ता संपली आहे'' असे ते म्हणाले.
''वंचित आता राज्याबाहेर विविध राज्यात एनआरसी, सीएए व एनपीआर विरोधी आंदोलन करीत आपल्या कक्षा रुंदावत आहे. पक्षाच्या विरोधात जावून केलेल्या बेईमानीवर जालीम उपाय करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील वंचितचे कार्यकर्ते सक्षम आहेत. यापूर्वी तसा प्रयत्न करणारे अनेक सुरमा आज राजकीय विजनवासात आहेत, हा इतिहास आहे. दोन्ही माजी आमदारांनी पक्ष सोडला असेल तर पक्षाच्या नावावर मिळालेल्या आमदारकीची पेंशन व सवलती देखील स्वाभिमान पुर्वक सोडून दिली पाहीजे,'' असे आवाहनही पातोडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीमधील दोन माजी आमदार हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार यांच्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आमदारांसह राज्यातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पक्ष सोडला आहे. विशेषतः धनगर व माळी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे वंचितकडून हे दोन्ही समाज दुरावल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे यांनी राजीनाम दिला. त्यापूर्वीपासूनच ते काँग्रेसच्या संपर्कात होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी जिल्ह्यातील काही प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांसोबत झालेल्या खासगी बैठकीतही त्यांनी काँग्रेस प्रवेशाबाबत बोलून दाखविले होते. त्यामुळे येत्या काही दिवसात ते काँग्रेसच्या मंचावर दिसले तर नवल वाटणार नाही. राजीनामा देणारे दुसरे आमदार बळीराम सिरस्कार यांना विधानसभेचे तिकिट नाकारल्यानंतर त्यांनी उघडपणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्या संपर्कात असल्याचे बोलल्या जात होते. मात्र नंतर त्यांची जवळीक राष्ट्रवादी काँग्रेससोबत झाली. ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.