चंद्रकांतदादा, तुम्ही सत्तेच्या मस्तीत राहीलात : आमदार हसन मुश्रीफ 

''आमचं काय चुकलं, आम्ही टोल रद्द केला, एलबीटी घालवली असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात, पण तुम्ही लोकांचे प्रेम मिळवू शकला नाही, जिल्ह्यातील लोकांचे काळीज तुम्ही पकडू शकला नाही. तुम्ही सत्तेच्या मस्तीत राहीला आणि त्याचा परिणाम जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिसला,'' असा टोला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला.
Chandrakant Patil - Hasan Mushrif
Chandrakant Patil - Hasan Mushrif

कोल्हापूर : ''आमचं काय चुकलं, आम्ही टोल रद्द केला, एलबीटी घालवली असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात, पण तुम्ही लोकांचे प्रेम मिळवू शकला नाही, जिल्ह्यातील लोकांचे काळीज तुम्ही पकडू शकला नाही. तुम्ही सत्तेच्या मस्तीत राहीला आणि त्याचा परिणाम जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिसला,'' असा टोला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला.

आमदारपदी निवड झालेल्या जिल्हा बॅंकेचे संचालक मुश्रीफ यांच्यासह राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश नरसिंगराव पाटील यांचा बॅंकेच्यावतीने आज सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मुश्रीफ यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर चौफेर टोलेबाजी केली. इथे उणीदुणी काढण्यात काय अर्थ नाही. गेली काही दिवस पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रा. संजय मंडलिक यांच्यातील कलगीतुरा आपण पहात आहोत, असे सांगून मुश्रीफ म्हणाले,"शहरातील टोल हा कै. सदाशिवराव मंडलिक, कै. गोविंद पानसरे आणि डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून रद्द झाला. एलबीटी आमचे सरकार असतानाच रद्द झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यात दिसणारे कोणतेही मोठे काम दोन नंबरचे मंत्रीपद असतानाही पाटील करू शकले नाहीत, हे दुर्दैवी आहे.''

ते पुढे म्हणाले,"गेली पाच वर्षे तुम्ही पोलिसांच्या गराड्यात, आंदोलन-चळवळी दडपण्यामध्ये, घराकडे भेटायला येणाऱ्या माणसाचा अपमान करण्यामध्ये यात घालवली. तुमची वेळ घेतल्याशिवया भेटायचे नाही हे लोकांना रूचले नाही. तुम्ही लोकांची अस्थेवाईपणे चौकशी केली असती, प्रत्येक व्यक्तीच्या समस्या ऐकल्या असत्या तर कोल्हापुरच्या लोकांनी तुम्हाला डोक्‍यावर घेतले असते. पोलिसांच्या गराड्यात राहून हजारो पोलिस भोवताली ठेवायचे हेच तुमचे चुकले. कोल्हापुर जिल्ह्यातील लोकांचा विश्‍वास मिळवण्याबरोबरच या लोकांना हाताच्या फोडासारखे जपण्याचे काम तुमच्या हातून झाले नाही. याचेच हे परिणाम निवडणुकीत दिसले.'' सत्ता हातात आल्यानंतर जर आपण प्रेमाने आणि लोकांच्या विचाराने काम केले नाही तर काय घडते हे दिसले. त्यातून ही सूज उतरली आहे. पाटील यांचे हेच चुकले आहे, पुढच्या काळात ते सुधारतील, त्यातून पुन्हा एकदा ते जनतेचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न करतील, असा टोलाही श्री. मुश्रीफ यांनी लगावला.

सर्वाधिक त्रास मला
''सर्वाधिक त्रास पाटील यांनी मला दिला. जिल्हा बॅंकेत 88 चा निकाल द्यावा लागला, त्याला स्थगिती मिळवली. मला बॅंकेतून काढण्यासाठी दहा वर्षापुर्वीचा आदेश त्यांनी काढला. त्यालाही आम्ही रोखले. जिल्हा बॅंकेत दोन्हीही कारवायांना स्थगिती आणल्यानंतर राज्य बॅंकेची 88 खाली चौकशी लावली. अजित पवार यांना सांगितले की हसन मुश्रीफ यांच्यामुळे ही कारवाई करतो. यालाही आम्ही रोखले, म्हणून तुम्ही ईडी कडे तक्रार केली. फक्त माझ्यामुळे ईडीचा गुन्हा नोंद केला. मी शरद पवार यांनाही सांगितले.  त्यानंतर प्राप्तीकर विभागाची धाड टाकली. एखाद्या राजकारणात विचार आणि मतभेत वेगवेगळे असू शकतात, पण त्या वैचारिक पध्दतीने हे केले पाहीजे. अशा प्रकारे सत्तेचा वापर केला तर त्याचे दुष्परिणाम राज्यभर दिसले,'' असेही मुश्रीफ म्हणाले.

सत्ताच आली असती
या निवडणुकीत जनतेचा रोष सरकार विरोधात होता हे आम्हाला समजले. त्यातून आमचेच सरकारच आले असते, पण ते थोडक्‍यात निसटले. कुठे एमआयएमचा, कुठे वंचितचा तोटा झाला, कुठे आमच्या उमेदवाराला कमी मते मिळाली. काही जागा कमी मताने पडल्या, पण हा निकाल बोध घेण्यासारखा आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com