कोल्हापूर : कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्याकरिता होम क्वारंटाईन सांगितले आहे. याचे उल्लंघन करणार्यांवर फौजदारी कारवाई करुन त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
''मागील काही दिवसात आपण परदेश प्रवास करून आला आहात किंवा परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला आहात. आपणास कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये किंवा आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांना किंवा परिसरातील नागरिकांना संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी घेण्यात यावी. त्यामुळे छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आपणास खालील निर्देश देण्यात येत आहेत,'' असे या आदेशात म्हटले आहे.
हे आदेश असे आहेत....
1) आपण, आपले कुटुंबीय व इतरांपासून नेमून दिलेल्या कालावधीत अलगीकरण करावे व कोणाचाही संपर्क न येता, स्वतंत्र रहावे.
2) आपण ज्या ठिकाणी रहात आहात किंवा आपणास ठेवण्यात येत आहे तेथे बाहेरील कोणतीही व्यक्ती आपल्या थेट संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
3) आपण वर नमूद केल्याप्रमाणे कालावधीसाठी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये.
या आदेशात नमूद अटींचे उल्लंघन केल्यास आपल्या विरूध्द तात्काळ भारतीय दंड विधान संहिता कलम 188,269,270,271 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे आपणास शासनाकडून सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात येईल, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.