जे पाकला 70 वर्षे जमले नाही ते मोदी-शहांनी करून दाखविले, केजरीवालांचा घणाघात 

जे पाकला 70 वर्षे जमले नाही ते मोदी-शहांनी करून दाखविले, केजरीवालांचा घणाघात 

कोलकाता : ""पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षात देशात विष कालविले. पाकिस्तानला जे सत्तर वर्षात जमले नाही ते मोदी-शहा यांनी पाच वर्षात करून दाखविले. या जोडीने देशाचे वाटोळे केले.'' असा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज येथे केले. 

नरेंद्र मोदींच्या नोटबंदीमुळे सव्वाशे कोटी नोकऱ्या संपल्या, शेतकरी देशोधडीला लागला. देशभरातील शेतकऱ्यांच्या मनात भाजपविरोधात संताप आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे अशा अत्याचारी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केले. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकातात मोदी विरोधकांना एकत्र घेऊन जाहीरसभा आयोजित केली होती. या सभेत केजरीवाल बोलत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, फारूख अब्दुल्ला, शरद यादव, अखिलेश यादव, मुख्यमंत्री कुमारस्वामी, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा आदी रथीमहारथी नेते यावेळी उपस्थित होते. 

केजरीवाल यांनी मोदी सरकारविरोधात तोफ डागली. ते म्हणाले, ""पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षात देशात विष कालविले. पाकिस्तानला जे सत्तर वर्षात जमले नाही ते मोदी-शहा यांनी पाच वर्षात करून दाखविले. या जोडीने देशाचे वाटोळे केले. ही जोडी देशाचे तुकडे करण्यापूर्वीच या जोडीच्या पक्षाची सत्ता खाली खेचण्याची गरज आहे.'' 


 
सत्य बोलणे हे बंड असेल तर मी बंडखोर आहे. सत्य आणि मुल्यांशी मी तडजोड करणार नाही. लोकांना परिवर्तन हवे असून जनतेला नवे नेतृत्व हवे आहे. भाजपने केवळ आश्‍वासनेच दिली कामे केली नाही. 
शत्रुघ्न सिन्हा, भाजपचे बंडखोर नेते 

सत्तर वर्षांमध्ये प्रथमच प्रादेशिक पक्ष एवढ्या ताकदीने पुढे आले आहेत, याच पक्षांनी स्वत:च्या राज्याचे हितरक्षण करण्याबरोबरच लोकांच्या भावना समजून घेतल्या. भारत जगातील सर्वांत मोठी लोकशाही असून सध्या मात्र काही अराजकवादी मंडळी लोकशाहीचे नेतृत्व करत आहेत. 
एच.डी.कुमारस्वामी, मुख्यमंत्री कर्नाटक 


समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्याने देशात आनंदाची लाट उसळली असून भाजपच्या चिंता मात्र वाढल्या आहेत. ते आम्हाला पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, असे विचारतात. परंतू त्यांच्या बाजूने नरेंद्र मोदी या नावाने देशाचाच भ्रमनिरास केला आहे. आता त्यांचा उमेदवार कोण आहे ते त्यांनी जाहीर करावे. 
अखिलेश यादव, अध्यक्ष समाजवादी पक्ष 

विकासासंबंधीच्या आकडेवारीशी छेडछाड करणारे स्वातंत्र्यानंतरचे हे पहिले सरकार असून सध्या सरकारची स्तुती करणे हीच देशभक्ती ठरत असून टीका केल्यास तुम्हाला देशद्रोही जाहीर केले जात आहे. काश्‍मीर संदर्भात मी तेथील लोकांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला पण मलाच देशद्रोही ठरविण्यात आले. 
यशवंत सिन्हा, माजी अर्थमंत्री 

लोकसभेची आगामी निवडणूक ही स्वातंत्र्यासाठीची दुसरी लढाई असेल. आम्ही हिंदुत्व आणि कट्टरतेच्या विषाचा प्रसार थांबवू. मोदींना पराभूत करा आणि देश वाचवा हेच आमचे आवाहन आहे. हे सरकार उद्योगपतींना हाताशी धरून काम करत असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर हा देश 50 वर्षे मागे जाईल. 
स्टॅलिन, अध्यक्ष "द्रमुक' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com