करमाळा विधानसभा मतदारसंघात दोघांच्या भांडणात तिसरा विजयी होणार का ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात दोघांच्या भांडणात तिसरा विजयी होणार का ?

सोलापूर : करमाळा विधानसभा मतदारसंघात मागीलवेळी 2014 मध्ये मोदी लाट असतानाही शिवसेनेच्या नारायण पाटलांनी बाजी मारली. मात्र, आता राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्‍मी बागल यांच्यामुळे पाटील यांना उमेदवारी मिळणार की नाही अशी समस्या आहे. नारायण पाटील यांनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह स्थानिक पदाधिकारी धरत आहेत तरीही पाटील यांची उमेदवारी नक्की नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बागल व पाटील यांच्या वादात तिसराच उमेदवार या मतदारसंघातून आमदार होणार की काय अशी चर्चा आहे. 

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शिंदे विधानसभा निवडणूक लढवतील आणि आपले आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार नाही याची खात्री झाल्याने बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लोकांच्या प्रश्नावर नाहीतर स्वतःच्या उमेदवारीसाठी पक्षांतर केल्याची चर्चा सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आमदार नारायण पाटील यांच्याऐवजी बागल यांना उमेदवारी मिळावी अशी भूमिका संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी घेतल्याची चर्चा आहे. 

पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यास पाटील शिंदे यांना मदत करतील, अशीही चर्चा सूरु आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे 4-5 आमदार विजयी होतील, असा आत्मविश्वास बाळगणाऱ्यांना करमाळा विधानसभा मतदारसंघही गमवावा लागतो की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बागल आणि पाटील यांच्यातील संघर्ष आपल्यासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास संजय शिंदे यांना वाटू लागला आहे. 

या नेत्यांच्या संघर्षाचा फायदा आपल्याला कसा मिळेल, याचे गणित शिंदे घालू लागले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जिवापाड प्रेम असल्याचे बागल यांनी आतापर्यंत दाखवले मात्र, ऐन विधानसभा निवडणूकीपूर्वी बागल यांनी शिवबंधन बांधून घेतले. त्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या गटाला आपलेसे करत आता शिंदे दोघांच्या भांडणात आपल्याला लाभ होईल, असे समीकरण मांडून विधानसभेची तयारी करु लागल्याची चर्चा आहे. बागल आणि पाटील यांच्यातील वाद मिटावा या उद्देशाने काल (बुधवारी) शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. मात्र, त्यावेळी त्यांच्यातील वाद उघड झाला. या पार्श्वभूमीवर आगामी काळात शिंदे यांची नारायण पाटील यांच्याशी जवळिकता वाढल्यास आश्‍चर्य वाटायला नको. 

धनगर समाजाचे निर्णायक मतदान 
मागील विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांना धनगर समाजासह इतर सर्व समाजाने मदत केली. मागील 5 वर्षात धनगर समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्वासन भाजप सरकारने पाळलेले नाही. शेतकरीही नाराज आहे. या पार्श्वभूमीवर नारायण पाटील यांच्याबद्दल सहानभूती असल्याचे चित्र आहे. तरीही पाटील यांना उमेदवारी नाकारल्यास पाटील यांच्या पाठीशी असलेल्या धनगर समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तो आतापासूनच अक्रमक होत आहे. त्यांना सोबत घेण्याचे शिंदे प्रयत्न करु लागल्याचीही चर्चा आहे. नारायणआबा उमेदवार नसल्यास मला मदत करा, अशी भूमिका ते घेऊ लागल्याचीही चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com