शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहायचयं - कल्याण काळे

मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहायचंय आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम हेच आपले ध्येय असल्याचे मत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहायचयं - कल्याण काळे

फुलंब्री : मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहायचंय आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम हेच आपले ध्येय असल्याचे मत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केले. 

आपल्या कार्यकाळात आघाडी सरकारने घेतलेला सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी हा निर्णय अत्यंत महत्वाचा होता असेही ते म्हणाले.

निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने कल्याण काळे आपली भूमिका मांडत आहेत. आपल्या आमदारपदाच्या कार्यकाळात केलेली कामे आणि आता निवडूण आल्यावर मतदारसंघाचा विकास कसा करणारा याची माहिती ते मतदारांना देत आहेत. 

कल्याण काळे म्हणाले, की फुलंब्री विधानसभा मतदारसंघात मी 2004 ते 2014 अशी दहा वर्ष प्रतिनिधित्तव केले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोणतेही नियम अटी न लावता रांगेत उभे न करता सरसकट कर्जमाफी दिली. याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला, माझ्यासाठी ही मोठी उपलब्धी होती.

या शिवाय त्याचकाळात कपाशीवर पडलेल्या "लाल्या रोगावर' पीकाचे झालेले नुकसान या विरोधात मी विधानसभेत आवाज उठवला आणि राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न केला. मतदारसंघात रस्ते, पिण्याचे पाणी, वीज यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

पराभवानंतरही संपर्क आणि काम सुरूच
2014 मध्ये माझा थोड्या मतांनी पराभव झाला. पण मी खचलो नाही, पाच वर्षापासून मतदारसंघातील प्रत्येक गावातील शेतकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क सुरु ठेवला. सत्तेत नसतांना सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी धरणे आंदोलने, रास्ता रोको आंदोलने, एल्गार मोर्चा, परिवर्तन मोर्चा काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.

झोपेचे सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला वेळोवेळी जागे केल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. सध्याच्या सरकारने मोठा गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली परंतु अनेक जाचक नियम लावल्याने फुलंब्री विधानसभा मतदार संघात दीड लाख शेतकऱ्यापैकी केवळ 30 हजार शेतकऱ्यानाच कर्जमाफीचा लाभ मिळाला.

बेरोजगारांना काम देणार..
फुलंब्री मतदार संघात शेंद्रा औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. इथे नवीन उद्योग व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुबलक जागा उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात एकही नवीन उद्योग आलेला नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार भूमिपुत्राच्या हाताला काम मिळालेले नाही.

दरवर्षी हजारो तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडत आहे. त्यांना सरकारी नोकऱ्या मिळणे कठीण असून खाजगी क्षेत्रातील उद्योगाच्या ठिकाणी त्यांच्या गुणवत्तेनुसार काम मिळाले पाहिजे या गोष्टीकडे मी प्रथम प्राधान्य देऊन शेंद्रा औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यातून सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा मला विश्‍वास आहे, असे त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com