जालन्याच्या विकासात रावसाहेब दानवेंचे मोठे योगदान - कैलास गोरंट्याल

जालन्याच्या विकासात रावसाहेब दानवेंचे मोठे योगदान - कैलास गोरंट्याल

जालना : गेल्या पाच वर्षात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प आणले. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देखील मिळवला, आतापर्यंत जिल्ह्याच्या विकासात इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांपेक्षा दानवे यांचे योगदान अधिक असल्याचे गौरवोद्दगार जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काढले. ऐरवी रावसाहेब दानवे कसे निष्क्रीय आहेत असे सांगत त्यांच्यावर टीकेची झोड उठवणारे कॉंग्रेसचे गोरंट्याल यांनी अचनाक दानवे यांची स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दानवे यांचे कौतुक करत गोरंट्याल यांनी भाजपपुढे मैत्रीचा हात तर केला नाही ना? अशी चर्चा देखील या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

पक्षात एकनिष्ठ राहूनही राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने दुखावलेले कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टोपे यांच्या सत्कार कार्यक्रमात स्तुतीसुमने उधळली. गोरंट्याल यांच्या या दानवे कौतुकामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. दानवे यांची स्तुती करत गोरंट्याल भाजपशी जवळीक साधून शिवसेनेला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचेही बोलले जाते. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, सुरेश जेथलिया, भास्कर दानवे, राजेश राऊत, शिवसेनेचे भास्कर अंबेकर या सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत नुकताच त्यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गोरंट्याल यांनी जालना जिल्ह्याच्या विकासात रावासाहेब दानवे यांचे अन्य नेत्यापेक्षा अधिक योगदान कसे आहे हे सांगतानाच शिवसेनेवर निशाणा साधला. 

शिवसेना आणि कॉंग्रेस नेत्यांच्या उपस्थितीतच जिल्ह्याच्या विकास कामासाठी दानवे यांनी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याचे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. ऐरवी दानवे यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप करणाऱ्या गोरंट्याल यांच्याकडून अचानक दानवेंची स्तुती झाल्याने उपस्थित नेत्यांना देखील आश्‍चर्याचा धक्का बसला. कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून देखील महाविकास आघाडीच्या सरकारच्या सरकारमध्ये गोरंट्याल यांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे गोरंट्याल नाराज असून ते नव्या पर्यायाच्या शोधात असल्याचे बोलले जाते. 

रावसाहेब दानवे यांची अचनाकपणे त्यांनी केलेली स्तुती याकडे गोरंट्याल भाजपच्या बाजूने झुकलेत की काय? असा अर्थ काढला जातोय. भाजपकडून गोरंट्याल यांना याआधी देखील अनेकदा पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती. पंरतु पक्षाशी एकनिष्ठ असल्याने पक्ष बदलणार नाही अशी भूमिका गोरंट्याल यांनी वेळोवेळी मांडली होती. पंरतु मंत्रिमंडळात समावेश न करून आपल्यावर अन्याय केल्यीाच भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी आपली नाराजी बालून देखील दाखवली. गेल्या पाच वर्षात पालिकेला केंद्राच्या योजनेतूनच अधिकचा निधी मिळाल्याने शहराच्या विकासाचा वेग वाढल्याचा दावा करत गोरंट्याल यांनी दानवे यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केल्याचे दिसते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com