विरोधकांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार - कैलास गोरंट्याल

 विरोधकांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार - कैलास गोरंट्याल

जालना : जालना विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्यांक व मागास समाजातील मतदारांचे ओळखपत्र हिसकावून घेऊन मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न काही उमेदवार करीत असल्याचा गंभीर आरोप कॉग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार कैलास गोरट्याल यांनी केला. 

गुरूवारी (ता.17) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोरंट्याल म्हणाले, पैशाचे प्रलोभनं आणि दडपशाहीचा मार्ग अवलंबणाऱ्या विरोधकांच्या या प्रकाराबाबत आपण मुख्य निवडणूक आयुक्तांकडे शुक्रवारी (ता.18) लेखी तक्रार करणार आहे. या निवडणूकीत आपल्यासाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे धास्ती घेतलेल्या या मंडळींनी शहरातील झोपडपट्टी भागातील विविध समाजातील मतदारांचे ओळखपत्र जमा करुन त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री मतदारांच्या बोटावर शाई लावून मतदारांना मतदानापासून रोखण्याचेही प्रयत्न करण्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे आणि जालन्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हरकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्तांकडेही यासंदर्भात तक्रार करणार असल्याचे स्पष्ट करून जिल्हा पोलीस प्रशासनाने हे प्रकार थांबवण्यासाठी शहरातील झोपडपट्टी भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी गोरंट्याल यांनी केली आहे. 

पोलिस प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी आणि सर्व गोपनिय शाखेमार्फत अशा प्रकारांवर करडी नजर ठेवावी, अशी मागणी त्यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात केली. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे पथकही शहरातील अशा भागात गस्तीवर ठेवावे. जालना शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या हातवण धरणातील पाणी जालना शहराला मिळावे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. याशिवाय घाणेवाडी जलसंरक्षण मंचातर्फे घाणेवाडी जलाशयातील गाळ उपसा व अन्य कामे गेल्या काही वर्षापासून सातत्याने सुरु आहे. या जलाशायाच्या पुर्नभरणाबरोबरच गाळ काढण्याच्या कामात घाणेवाडी जलसंरक्षण मंचाला आपण पुढील काळात पाठबळ देणार असल्याची ग्वाही देऊन मोतीबाग उद्यानाच्या पाठीमागील भागात सुरु असलेल्या वन उद्यानाच्या धरतीवर नवीन जालना भागातील लोकांसाठी सेंटमेरी समोर असलेल्या शासकीय जागेत वन उद्यान विकसीत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. 

जालना विधानसभेच्या मतदार यादीत पंधरा हजार मतदारांची दुहेरी नावे असून सदर नावे यादीतून तात्काळ कमी करावीत, अशी मागणी आपण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात केली असून या संदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com