औरंगाबादः ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वंचित बहुजन आघाडीला एमआयएम, सीपीएम, डावे, नक्षलवादी, माओवादी चालतात, पण रिपब्लिकन चळवळ चालत नाही. म्हणून त्यांनी वंचित आघाडीपासून आम्हाला वंचित ठेवले असा जोरदार टोला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकरांचे नाव न घेता लगावला.
औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात कवाडे पत्रकारांशी बोलत होते. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका स्पष्ट करतांना जोगेंद्र कवाडे म्हणाले, "संविधानाने निर्माण केलेल्या लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचणे हाच आमचा अजेंडा असणार आहे".
"कॉंग्रेस सोबत आघाडीची आमची बोलणी सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने कॉंग्रेसकडे सहा जागांचा प्रस्ताव दिला आहे. यापैकी चार जागा विदर्भ तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी एका जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत," असेही श्री. कवाडे म्हणाले .
ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडी सोबत आपली काही चर्चा झाली का? या प्रश्नावर ते म्हणाले ,"वंचित आघाडीने आम्हाला वंचित ठेवले. त्यांना एमआयएम, सीपीएम, डावे, नक्षलवादी, माओवादी चालतात पण कवाडे, आठवले, खोब्रागडेसह रिपब्लिकन पक्ष मात्र चालत नाही , " असा आरोप कवाडे यांनी केला .
" भीमा कोरेगांवमध्ये शौर्यदिना निमित्त शहीद व विजयस्तभांला अभिवादनाचा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून घेतला जातो. तिथे आलेल्या दलित बांधवांना संबोधित करण्यासाठी सभेचे आयोजन ही 1982 पासूनची परंपरा आहे.पण गेल्यावर्षी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी या परंपरेला गालबोट लावण्याचा प्रकार केला. त्यामुळे सरकारने यावेळी सभेला परवानगी नाकारली आहे. हा अन्यायआहे ," असेही जोगेंद्र कवाडे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.