राज्यातच नव्हे, तर देशात भाजपकडून गुंडाराज - इम्तियाज जलील

राज्यातच नव्हे, तर देशात भाजपकडून गुंडाराज - इम्तियाज जलील

औरंगाबाद : " आम्हाला नाही, तर कुणालाच नाही ' अशा वृत्तीने सध्या भाजपची वाटचाल सुरू आहे. केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात भाजपचे गुंडाराज सुरू असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटल्यानंतर आता पैशाच्या जोरावर फोडाफोडी करून भाजप कॉंग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेनेचे आमदार फोडून सरकार स्थापन करेल असा दावा देखील त्यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. 

राज्यातील सत्ता संघर्ष आणि त्यातून लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी आपली जळजळीत प्रतिक्रिया दिली. इम्तियाज म्हणाले, राज्यात विशेषता मराठवाड्यात ओल्या दृष्काळाची परिस्थिती आहे. लोकांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, अशावेळी शेतकऱ्यांना सगळे नियम, सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. पण सत्ताधारी भांडणात आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यातच मग्न आहेत. 

सत्तेसाठी सुरू असलेले युती आणि आघाडीमधील भांडण पाहत जनतेने यासाठीच का तुम्हाला निवडूण दिले ? असे म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यातील जनतेने कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या विरोधात युतीला कौल दिला आहे, तर युती नको वाटणाऱ्यांनी आघाडीला. अशावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडी बरोबर जाऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांना निवडून दिलेल्या जनतेचा अपमान आहे. हेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील म्हणावे लागेल. 

शिवसेना - भाजपची युती ही निवडणुकीआधी झालेली होती, मग शिवसेनेच्या नेत्यांना आता जाग कशी आली. त्यांनी भाजपकडून आधीच सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण आणि लेखी का घेतले नाही ? आता नाटक करण्याची काय गरज ? असा खोचक सवाल देखील इम्तियाज जलील यांनी केला. 

भाजप फोडाफोडी करणार 
भाजपने सत्ता स्थापनेला नकार दिला त्यामागे त्यांची खेळी होती, शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देण्याचा केवळ सोपस्कार पार पाडण्यात आला. तीन पक्ष एकत्र येऊ शकत नाही हे भाजप ओळखून असल्यामुळेच राज्यपालांच्या माध्यमातून भाजपने आपली खेळी केली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर ती यशस्वी देखील ठरली आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही? हे भाजपचे धोरण पहिल्यापासूनच राहिले आहे. ते फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही तर देशात याच गुंडाराज पध्दतीने भाजपने सरकारे स्थापन केली आहेत. दहा दिवस उलटून जाऊ द्या, पैशाच्या जोरावर भाजप शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडून पुन्हा सत्ता मिळवेल असा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com