..तर मनसेचा एकही आमदार परत दिसणार नाही : जलिल यांची भविष्यवाणी

..तर मनसेचा एकही आमदार परत दिसणार नाही : जलिल यांची भविष्यवाणी

औरंगाबादः दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. दिल्लीकरांनी हिंदू-मुसलमान, एनआरसी, सीसीएच्या मुद्यावर नाही, तर वीज, पाणी, आरोग्य या विकासाच्या प्रश्‍नावर केजरीवाल यांच्या हाती तिसऱ्यांदा सत्ता सोपवली आहे. मनसे आणि शिवसेनेसारख्या पक्षांनी यातून काहीतरी धडा घेण्याची गरज आहे. नसता मनसेचा सध्या एक आमदार निवडून आला आहे, पुढच्या निवडणूकीत तो ही येणार नाही, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसेच्या औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून लगावला.

मनसेचे आमदार राजु पाटील यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेने केवळ राजकारणासाठी या मुद्याचा वापर केला, परंतु मनसे राज ठाकरे यांच्या माध्यमातून हा प्रश्‍न सोडवेल असा दावा पाटील यांनी केला होता. मनसेच्या या मागणीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.

`सरकारनामा`शी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, केवळ जातीपातीचे राजकारण करणाऱ्या शिवसेना-मनसे सारख्या पक्षांसाठी दिल्ली विधानसभेचे निकाल हे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत. यातून या पक्षांनी काही बोध घेतला नाही तर भविष्यात त्यांची अधिक वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही.

 राज ठाकरे यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा एक आमदार निवडूण आला आहे, हीच भूमिका त्यांनी कायम ठेवली तर पुढच्यावेळी त्यांचा एकही आमदार निवडूण येणार नाही.

शिवसेनेचे चंद्रकांत खैरे वीस वर्ष जिल्ह्याचे खासदार होते, एवढ्या प्रदीर्घ काळात किती वेगाने विकास व्हायला हवा होता. पण अजूनही हिंदू-मुस्लिम, औरंगाबाद-संभाजीनगर यामध्येच शिवसेना अडकून पडली आहे. 

शहारचे नामकरण करण्याचा एवढा अट्टाहास असेल तर आधी ज्या छत्रपती संभाजी महाराजांचे नाव शहराला तुम्ही देऊ पाहत आहात, आधी ते शहर त्यांना साजेशे तर करून दाखवा. वीस-पंचवीस वर्ष तुम्ही ज्या पध्दतीने शहराची वाट लावली आहे, ते पाहता संभाजी महाराजांचे नाव शहराला देणे म्हणजे त्यांचा अपमानच ठरेल असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला लगावला.

विकास हाच मुद्दा...

महापालिका निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सत्ताधारी शिवसेनेकडे शहरवासियांना सांगण्यासारखे काही नाही. शहराची अवस्था बकाल झाली आहे, तरीही शिवसेनेकडून निवडणूक प्रचारात पुन्हा औरंगाबाद-संभाजीनगर, हिंदू-मुस्लिम हे मुद्दे पुढे केले जातात.

लोकांना याचा आता वीट आला आहे. त्यामुळेच मतदारांनी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला घरी बसवले. यानंतरही शिवसेना हेच मुद्दे पुढे करून निवडणूक लढणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे असा चिमटा काढतांनाच आम्ही मात्र महापालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्यावरच मतदारांसमोर जाणार आहोत असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com