उस्मानाबाद शहराचे नाव 'धाराशिव' करण्याबाबतच्या राज्याच्या प्रस्तावास (२४ फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गृहमंत्रालयाने अधिकृत परिपत्रक जारी करत मान्यता दिली आहे. उस्मानाबादचे नाव धाराशिव झाले असले तरी ही मागणी पंचवीस वर्षापुर्वीची आहे.
धाराशिव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव 'धाराशिव' पडल्याची आख्यायिका आहे.
हैदराबादमधील सातवे 'मीर उस्मान अली खान' यांच्या नावावरून शहराला उस्मानाबाद हे नाव मिळाल्याचेही संदर्भ आढळतात. नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एक मध्ये उस्मान अली खान यांनी सन 1900 साली धाराशिव हे नाव बदलून उस्मानाबाद केलं, असाही उल्लेख आहे.
तर 1998 मध्ये औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेत, 1904 साली तत्कालीन लोकप्रिय राजा 'तिसरे खलिफा हजरत उस्मान राझी अल्लाह' यांच्या नावावरून नामांतर केलं असल्याचं नमूद केलं आहे. तेव्हापासून म्हणजेच 1904 पासून आजतागायत या गावाचे नाव उस्मानाबाद असल्याचा उल्लेख आहे.
उस्मानाबादचं पुन्हा एकदा धाराशिव करण्याची घोषणा सर्वात आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. तुळजापूर येथील शिवसेनेच्या महिला मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या नामांतराची घोषणा केली.
त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा केली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत उस्मानाबाद नामांतराची घोषणा करत शहराचे नाव 'धाराशिव करण्यास मंजुरी दिली होती.