मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली आहे. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन त्यांनी गुढीपाडव्यादिवशी सभेतून केले होते. त्यानंतर राणा दाम्पत्याने 23 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहीर केले. त्याआधी त्यांनी हनुमान जयंतीदिवशी अमरावतीत चालीसा पठण केले.
राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर शिवसेनेचे पदाधिकारी, नेते आक्रमक झाले. त्यांनीही राणांना मुंबईत येण्याचे आव्हान दिले. पोलिसांनी राणांना अमरावतीतच थांबवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पण दोघेही आदल्यादिवशीच मुंबईतील खार येथील निवासस्थानी दाखल झाले. हे समजताच शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले.
राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर जाऊ नये, यासाठी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली. पण त्यानंतर राणा दाम्पत्याने पत्रकार परिषद घेत 23 तारखेला जाणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले.
राणा दाम्पत्याविरोधात 23 तारखेला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मातोश्रीसमोर जमा झाले. तसेच राणांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर मोठा जमाव जमला होता. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांकडून राणांना मातोश्रीकडे न जाण्याबाबत सातत्याने सांगितले होते.
दिवसभराच्या घडामोडीनंतर नवनीत राणा व रवी यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री त्यांच्यावर सरकारी कामात अडथळे आणणे, चिथावणीखोर वक्तव्ये आदी कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांना मध्यरात्री सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी राणा दाम्पत्याला न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनीच यावेळी दिली. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी वकिलांनी केली. पण न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
कोठडी सुनावल्यानंतर नवनीत राणा यांना भायखळा कारागृहात तर रवी राणा यांना तळोजा कारागृहात नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला. पण न्यायालयाने 29 तारखेला यावर सुनावणी ठेवली. हा निर्णय सत्र न्यायालयात गेला. पण विविध कारणांमुळे जामीनावरील सुनावणी लांबत गेली.
तुरुंगात असताना नवनीत राणा यांनी वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात पाणीही देण्यात आले नाही. आपला छळ केल्याचा दावा राणांनी पत्रातून केला. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्य चहा पितानाचा व्हिडीओ ट्विट केला. या आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं.
अखेर मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला बुधवारी जामीन दिला. यादरम्यान नवनीत राणा यांना मानदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी तुरूंगातून बाहेर येताच त्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या.
नवनीत राणा यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
रवी राणा हेही गुरूवारी तळोजा कारागृहातून बाहेर आले. त्यांनीही थेट पत्नी नवनीत राणांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात धाव घेतली. जवळपास बारा दिवसानंतर दोघांची भेट झाली होती. त्यामुळे नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. आता नवनीत राणांची प्रकृती ठीक झाल्यानंतर दोघेही थेट दिल्ली गाठणार असल्याचे समजते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.