हर्षवर्धन पाटील यांची `विधानगाथा` आगामी विधानसभा निवडणुकीत काय विधान करणार?

आपल्या विधानगाथा या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित करून हर्षवर्धन पाटील यांनी आगामी राजकीय समीकऱणांची सोय करून ठेवली आहे.
हर्षवर्धन पाटील यांची `विधानगाथा` आगामी विधानसभा निवडणुकीत काय विधान करणार?

वालचंदनगर : माजी मंत्री व कॉंंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या `विधानगाथा` पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली   मंगळवार (ता.३०) रोजी होणार आहे. याचे निमंत्रण देण्यासाठी पाटील हे मुख्यमंत्र्याच्या भेटीला दोन दिवसांपूवी  `वर्षा`वर गेले होते. या भेटीमुळे हर्षवर्धन पाटील यांचे विधानसभा निवडणुकीतील विधीचे विधान काय असणार, याची उत्सुकता असणार आहे. 

राज्यामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजप व सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे. अनेकांनी पक्षांतरही केले.  हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. ती नंतर त्यांनी फेटाळून लावली होती. आता हर्षवर्धन यांच्यासोब त्यांची मुलगी व जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, मुलगा राजवर्धन यांनीही फडणवीस यांची भेट घेतली.

पाटील यांनी 1995 ते 2014 अशा वीस वर्षांत विविध मुख्यमंत्र्यांच्या मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री पदावर काम केले. सहकार, पणन, महिला व बालकल्याण यासह अनेक खात्यांचा त्यांनी कारभार सांभाळला. वर्षांच्या कालावधीमध्ये आलेले अनुभव त्यांनी ‘ विधानगाथा’ पुस्ताकातून मांडले आहेत. याचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये होणार आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बिघाडीचा सर्वाधिक झटका हर्षवर्धन पाटील यांना बसला. या निवडणुकीमध्ये पाटील यांचा तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रेय भरणे यांनी पराभव करुन तालुक्याचे आमदार झाले. गेल्या वर्षी अंथुर्णेमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाटेल ते झाले तरीही इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे वक्तव्य करुन इंदापूरच्या जागेचा पेच निर्माण केला आहे. यानंतर अजित पवार यांनी इंदापूरच्या जागेचा निर्णय पवारसाहेब घेतील, असे सांगून पवार साहेबांच्या कोर्टात चेंडू टाकला आहे.

लोकसभेच्या निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदापूरच्या सभेत भाषण करताना हर्षवर्धन पाटील साहेब  किती दिवस बारामतीच्या पालख्या उचलणार, असे वक्तव्य करुन अपत्यक्ष भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र पाटील यांनी लोकसभेच्या निवडणूकीमध्ये आघाडीचा धर्म पाळून खासदार सुप्रिया सुळे यांना तालुुक्यातून ७० हजापेक्षा जास्त मताधिक्य दिले. सध्या इंदापूरमधून आमदार भरणे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली असल्यामुळे आघाडीची जागा कोणाला मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच `विधानगाथा` काय ठरविणार, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com