हर्षवर्धन पाटील यांच्या पश्चातापाला तर पारावर नसेल......

हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेवर पाठविण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शवली होती.....
हर्षवर्धन पाटील यांच्या पश्चातापाला तर पारावर नसेल......

पुणे : राज्यात भाजपचे सरकार स्थापन न झाल्याने अनेक जुन्या काॅंग्रेस नेत्यांची कोंडी झाली आहे. या नेत्यांत राधाकृष्ण विखे पाटील, मधुकरराव पिचड आणि हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे. यातही पाटील यांचे दुःख मोठे आहे. काॅंग्रेस नेत्यांच्या प्रथम फळीत समावेश असलेल्या पाटील यांच्याकडे आता आमदारकीही नाही. शिवसेना-काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार जेव्हा स्थापन होईल, तेव्हा या दुःखावर अधिक डागण्या बसतील.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विरोधात जे काॅंग्रेसचे नेते होते, त्यात पाटील यांचा पहिला क्रमांक होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या बारामतीशेजारीच पाटील यांचा इंदापूर मतदारसंघ असल्याने नेहमीच पाटील विरुद्ध पवार असा सामना रंगला. अर्थात यात पाटील विरुद्ध अजित पवार यांच्यातच नेहमी वाद व्हायचे. विधानसभेच्या 1995 च्या निवडणुकीत पाटील यांना काॅंग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. पवारांमुळेच ती मिळू न शकल्याची तक्रार करत पाटील यांनी बंडखोरी केली. ते पहिल्यांदा आमदार झाले. सेना-भाजपच्या युती सरकारमध्ये लगेच राज्यमंत्री झाले. तेथून ते तब्बल जवळपास 18 वर्षे मंत्री होते.

राज्यात 1999 मध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर युतीशी संधान साधून असलेले पाटील हे काॅंग्रेसच्या गोटात आले. तेथे विलासराव देशमुख यांनी त्याला मंत्री केले. त्यांच्या मंत्रिपदाला राष्ट्रवादीने आक्षेप घेतला. त्यांना ते पद सोडावे लागले. मात्र नंतर ते पुन्हा मंत्री झाले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसशी कधी दोस्ती तर कधी कुस्ती करत पाटील यांनी आपला इंदापूर मतदारसंघ सांभाळला होता. राष्ट्रवादीने उघडपणे तर कधी थेट पाटील यांची इंदापुरातील सत्ता संपविण्याचे प्रयत्न केले. राष्ट्रवादीला पहिल्यांदा 2014 मध्ये यश आले. त्या वेळी पराभवामुळे खट्टू झालेले पाटील हे तरीही काॅंग्रेसमध्ये आपले स्थान राखून होते. पक्षश्रेष्ठींशी त्यांचे चांगले संबंध होते.

इंदापूर हा मतदारसंघ दोन्ही काॅंग्रेसच्या जागावाटपात 2019 च्या निवडणुकीत आपल्याला मिळत नसल्याचे पाहून त्यांनी भाजपमध्ये उडी घेतली. मात्र पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची लाटच आल्याने पाटील यांचा दुसऱ्यांदा विधानसभेला पराभव झाला. काॅंग्रेसचे घर हे विनासत्तेचे राहणार म्हणून त्यांनी सोडले. त्यांनी पक्ष सोडल्याबद्दल काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे हळहळ व्यक्त केली होती. कारण त्यांचे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध होते. 1995 ते 2014 या कालावधीतील प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात समावेश असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. अऩिल देशमुख आणि हर्षवर्धन पाटील हे दोघेच अशी किमया साधू शकले होते. 

मतदारसंघ काॅंग्रेसला मिळत नाही म्हणून पक्ष सोडण्याऐवजी दुसरा पर्याय पाटील यांच्याकडे नव्हता का, या प्रश्नावर त्यांना विधान परिषदेवर पाठविण्याची राष्ट्रवादीची तयारी होती, असे सांगण्यात आले. मात्र हा पर्याय पाटील यांना रुचला नाही. राज्यात भाजपच सत्तेवर येणार असल्याने कशाला पुन्हा विरोधात बसायचे, याचा विचार त्यांनी त्या वेळी केला. पाटील यांना आपण पुन्हा भाजप सरकारमध्ये मंत्री बनू, असे स्वप्न रंगविले. प्रत्यक्षात त्यांना आमदारकीही मिळू शकली नाही.  

निवडणुकीनंतर तर सगळी गणिते बिघडली. भाजप-सेना युती तुटली. काॅंग्रेस पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे दिसू लागले. ज्यांनी काॅंग्रेस ऐनवेळी सोडली अशांना पश्चाताप होत असेल का? त्यात पाटील यांच्या पश्चातापाला तर पारावर नसेल.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com