ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी मुश्रीफ आग्रही

hasan mushrif
hasan mushrif

सोलापूर : राज्यातील 19 जिल्ह्यांमधील एक हजार 570 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान असून निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर केला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला असून शाळा, महाविद्यालयांनाही सुट्ट्या दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले असून त्यानुसार राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे.

जनतेतून थेट सरपंच निवड रद्द करुन आता पूर्वीप्रमाणे बहूमताद्वारे सरपंच निवडीचा अध्यादेश निघाला आहे. मात्र, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या एक हजार 570 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम 24 फेब्रुवारीला म्हणजेच थेट सरपंच निवड रद्द होण्यापूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेतूनच केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीसाठी मतदारांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची सुरक्षितता म्हणून ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशा मागणीचे पत्र ग्रामविकास मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मंत्रिमंडळाचे अधिवेशन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आटोपते घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे हे यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठविणार आहेत. दरम्यान, गुरुवारपर्यंत निवडणूक आयोगाकडून निर्णय अपेक्षित आहे.

जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ठाणे (13), रायगड (1), रत्नागिरी (8), नाशिक (102), जळगाव (2), नगर (2), नंदुरबार (38), पुणे (6), सातारा (2), कोल्हापूर (4), औरंगाबाद (7), नांदेड (100), अमरावती (526), अकोला (1), यवतमाळ (461), बुलडाणा (1), नागपूर (1), वर्धा (3), गडचिरोली (296) या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान असून 30 मार्चला निकाल जाहीर होणार आहे.
-
एप्रिल ते जून या काळात मुदत संपणाऱ्या राज्यातील 19 जिल्ह्यांमधील एक हजार 570 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान होणार आहे. मात्र, राज्यातील कोरोनाच्या प्रसारामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार आता निवडणूक आयोगाला मागणी कळवून काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे, असे
हसन मुश्रिफ (ग्रामविकास मंत्री) यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com