नवी दिल्ली : हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कोनसा मेडल मिला था...असे ट्वीट करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला मारला आहे. भाजप व शिवसेनेत काडीमोड झाल्याचे जवळपास स्पष्ट असून आम्ही वाईट आहोत, तेच बरे आहे, असे राऊत यांचे म्हणणे आहे.
राज्यात सत्ता स्थापनेचा खेळ सुरु झाल्यापासून राऊत रोज सकाळी ट्वीट करत आहेत. त्यातून ते कधी काँग्रेस-राष्ट्रवादीशी होत असल्याच्या जवळीकीचे संकेत देत आहेत तर कधी आपला पूर्वीचा मित्र पक्ष भाजपला टोमणे मारत आहेत. आजचे ट्वीटही त्यांनी भाजपला टोमणा मारण्यासाठी केले आहे.
दरम्यान, पुढच्या एक दोन दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष अंतीम निर्णयापर्यंत पोहोचतील आणि डिसेंबर सुरु होण्याच्या आत राज्यात सरकार स्थापन होईल. या सरकारचे नेतृत्व शिवसेनाच करेल, असे सेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची कालची बैठक किमान समान कार्यक्रमावर होती, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी काल चर्चा झाली नाही. मात्र, आज ती होईल असे ते म्हणाले. या पुढच्या सर्व बैठका मुंबईतच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हवे आहे, या बातम्या खोट्या असून त्यावर विश्वास ठेऊ नका, असे ते म्हणाले. ज्यांना सरकार स्थापन होऊ नये असे वाटत आहे, तेच अशा बातम्या पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, असेही राऊत यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.