गुगली : नितीन गडकरी यांची "खानपान की बात' 

राजकीय घटना घडामोडीवर खुसखशीत भाष्य
गुगली : नितीन गडकरी यांची "खानपान की बात' 

नितीन गडकरी यांची "खानपान की बात' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरून प्रसारित होणारा "मन की बात' कार्यक्रम बराच लोकप्रिय झाला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही मुलाखत विविध भारतीवरून नुकतीच प्रसारित झाली.

मुलाखतकर्त्याने गडकरींना विकासकामांवर बोलते करण्याऐवजी खानपानातच अधिक रस दाखविला. मुलाखतकर्त्याच्या या अतिउत्साहामुळे आलू वडा, गरमागरम भजी, नागपुरी भाषेतील रस्सा, चना-पोहा या भोवतीच मुलाखत फिरत राहिली.

गडकरींच्या वाड्यावर होणारे खमंग पदार्थ आणि या पदार्थांची थोरामोठ्यांनी केलेली स्तुती, अनेकांनी वाड्यावरून दिल्लीला पार्सलमध्ये नेलेले पदार्थ अशा चविष्ट गप्पा या मुलाखतीत झाल्या. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे सपत्नीत वाड्यावर आले असताना त्यांनी पार्सल करून पदार्थ आपल्यासोबत नुकतेच नेले असल्याचेही यानिमित्ताने कळाले. 

महादेवराव महाडीक बरे बोलले की खरे? 


"कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माझी दोस्ती तुटायची नाही. त्यांना आमदार करणारच,' असे आश्‍वासन कॉंग्रेसचे माजी आमदार पण सध्या भाजपसोबत असलेले महादेवराव महाडीक यांनी दिले आहे.

कोल्हापूरचे प्रमुख अर्थिक सत्ताकेंद्र "गोकुळ' आहे. त्यावर पी. एन. व महाडीक यांच्या नेतृत्त्वाखालील सत्ता आहे. पण याच महाडिक यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत पी. एन. यांच्या मुलाविरोधात आपल्या स्नुषा सौ. शौमिका महाडीक यांना उभे करून विजयी केले.

त्यांचे पुत्र भाजपाचे आमदार आहेत, स्नुषा या जिल्हा परिषद अध्यक्षा. पुतण्या खासदार धनंजय महाडीक हेही भाजपाच्या वाटेवर आहेत. 18 वर्षे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिलेले महादेवराव भाजपला पोषक राजकारण जिल्ह्यात करत आहेत.

दुसरीकडे "पी.एन.' हे कॉंग्रेसचे कट्टर निष्ठावंत आहेत. या स्थितीत महाडिक खरचं करे बोलले की त्यांनी पी.एन. यांना फक्त गाजर दाखविले, हे आता विधानसभा निवडणुकीतच कळेल. 

शिरूर बाजार समिती तोट्यात; पण प्रचार थाटात 


सहकारातील निवडणुका म्हणजे खर्चाची बोलायची सोय नाही. शिरूर (जि. पुणे) बाजार समितीच्या 22 कर्मचाऱ्यांना तीन महिने पगार नाही. दीड कोटींचे कर्ज फेडण्यासाठी रक्कम नाही. मात्र या बाजार समितीच्या 17 जागांच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि भाजपने पॅनेल उभे केले आहे. पॅनेलसाठी खर्चाची एकत्रित रक्कम म्हणून 25 ते 40 लाख रूपये प्रति उमेदवार गोळा करण्यात आले आहेत. मतदारासाठी आताचा भाव हा 25 हजार रूपये आहे. पण त्याला कोणी हात लावत नाहीत. कारण मतदानाच्या दिवशी या पेक्षा जास्त रक्कम मिळणार असल्याची खात्री मतदाराला आहे. सोसायट्यांचे व ग्रामपंचायतीचे सदस्य हे या निवडणुकीसाठी मतदार आहेत. तेच मोठा खर्च करून निवडून आले असल्याने या मतदारांसाठी बाजार समितीची निवडणूक सुवर्णसंधी ठरली आहे. ज्या बाजार समितीत बसायला नीट कार्यालय नाही, तेथील फुटकळ पदासाठी काही कोटीचा चुराडा सुरू आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com