भाजपच्या चार नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन 

गेल्या अनेक दिवसांपासून आमदार गणेश नाईक यांच्या गोटातून फुटलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला
Four BJP Corporators from Navi Mumbai Enter Shivsena
Four BJP Corporators from Navi Mumbai Enter Shivsena

नवी मुंबई  : गेल्या अनेक दिवसांपासून आमदार गणेश नाईक यांच्या गोटातून फुटलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संतीगा वास्के आणि मुद्रीका गवळी यांच्यासहीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कुलकर्णी नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे नाईकांना आत्तापासूनच धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे.

एप्रिल महिन्यात होत असलेल्या महापालिका निवडणूक मविआतर्फे लढवली जाणार आहे. राज्यात भाजपची होत असलेली पिछेहाट पाहता महापालिका निवडणूकीतही भाजपला जनाधार मिळण्याची शक्‍यता धुसर होत चालली आहे. या परिस्थितीत पुन्हा नाईकांसोबत राहीलो तर महापालिका निवडणूकीत निवडून येण्याची शक्‍यता कमी वाटत असल्यामुळे नाईकांच्या गोटातील अनेक नगरसेवक परतीच्या मार्गावर आहेत. त्यापैकी तुर्भे परिसरातील सुरेश कुलकर्णी हे सलग चार वेळा नगरसेवक राहील्यामुळे तसेच गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी त्यांच्यासोबत आणखी तीन नगरसेवक निवडून आणल्यामुळे बलाढ्य नगरसेवक अशी त्यांची ख्याती आहे. 

परंतु, गेल्या पंचवार्षात तुर्भे कचरा भूमीचा न सुटलेला प्रश्‍न, रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुल व उड्डाणपूल उभारण्यासाठी करावा लागलेला पत्रप्रपंच, जिर्ण व जून्या जलवाहिन्यांमुळे सतत तुर्भे विभागाला सोसावी लागणारी पाणी टंचाई आदी प्रश्‍नांवरून याआधी सुद्धा कुलकर्णी नगरसेवकांनी महापालिकेत आंदोलन करून स्वतःच्या सत्तेला घरचा आहेर दिला होता. परंतू तरी देखील कुलकर्णी यांचे प्रश्‍न महापालिकेत सुटले जात नव्हते. त्यामुळे बऱ्याचदा कुलकर्णी यांना स्वतःच्या हिम्मतीवर झगडून प्रश्‍न सोडवावे लागत होते. 

कुलकर्णी यांचा प्रभाव असलेला तुर्भे प्रभागत बहुतांश मतदार हा अल्पसंख्याक बहुल भाग असल्यामुळे सद्याच्या देशातील जातीय परिस्थितीत भाजपला मतदान मिळेल अशी शक्‍यताही कमी आहे. तसेच कुलकर्णी यांनाच भाजपमध्ये न राहता इतर पक्षात जाण्याचा सल्लाही मतदारांनी दिल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे. कुलकर्णी यांच्या प्रवेशामुळे भाजपला तुर्भेत चार ठिकाणी नवे चेहरे शोधावे लागणार आहेत. परंतु, गेल्या एवढ्या वर्षात कुलकर्णी यांच्याऐवजी दुसरा उमेदवार न शोधल्यामुळे तुर्भ्यावर भाजपला पाणी सोडावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com