पश्चिम महाराष्ट्र : बांधावर असलेल्या नेत्यांची संख्या वाढायला लागली

सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित होणाऱ्या नेत्यांची देशभरात काही कमी नाही. सत्तेवर असलेल्या पक्षाकडून सत्तेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा त्या राजकीय पक्षाची सत्ता गेली, की जो सत्तारूढ असेल त्याकडे ओढा असणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत आहेत.
पश्चिम महाराष्ट्र : बांधावर असलेल्या नेत्यांची संख्या वाढायला लागली

'उडाले ते कावळे, राहिले ते मावळे' असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित होणाऱ्या नेत्यांची देशभरात काही कमी नाही. सत्तेवर असलेल्या पक्षाकडून सत्तेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा त्या राजकीय पक्षाची सत्ता गेली, की जो सत्तारूढ असेल त्याकडे ओढा असणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत आहेत. कारण काही का असेना ? पश्‍चिम महाराष्ट्राचा विचार केला तर बांधावर असलेल्या नेत्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. सेना-भाजपची युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी यामुळेही काही ठिकाणची समीकरणे बदलू लागण्याची दाट शक्‍यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत मोदी लाट होती. त्या वेळी 'स्वाभिमानी'बरोबर भाजपची युती होती. त्याचा फायदा उठवण्यासाठी 'राष्ट्रवादी'तून बाहेर पडलेले संजय शिंदे यांनी करमाळा येथून निवडणूक लढविली. त्यात अपयश आले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय मिळविला. अध्यक्षपदासाठी भाजप, सेना, कॉंग्रेस अशा सर्वच पक्षांची मोट बांधून त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षाचा लाभ घेतला. माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना त्यांचा उघड विरोध आहे. आगामी निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आल्यानंतर त्यांची मोठी अडचण झाली होती. पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्याने आता परिचारक-शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून परिचारक यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या पदरी यश आले. मूळचे राष्ट्रवादीचे परिचारक यांनी सत्ताधीशांचा लाभ घेतला.

पुण्याचे राज्यसभा सदस्य संजय काकडे यांची परिस्थिती याहून वेगळी नाही. त्यांनी भाजपकडून सहयोगी म्हणून खासदारकी मिळवली. त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. अशीच काहीशी परिस्थिती पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप यांचीही आहे. त्यांना भाजपची आमदारकी मिळाली; परंतु गेल्या साडेचार वर्षांत सत्तेचा उपभोग घेतल्यानंतर ते पुन्हा 'राष्ट्रवादी'च्या वाटेवर आहेत. 'राष्ट्रवादी'चे माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही कमळ हाती घेतले आहे. युतीच्या जागा वाटपात खेड (जि. पुणे) मतदारसंघ सेनेच्या वाट्याला जाईल. त्यामुळे भाजपचे शरद बुट्टे पाटील यांचे पुन्हा तळ्यात मळ्यात राहील.

जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष सुरेश गोरे यांचीही स्थिती अशीच होती. त्यांनी सेनेतून उमेदवारी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी यश मिळविले. शरद पवार यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादीचे नेते राहुल कुल यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाची वाट धरली. ते निवडून आले. आता मात्र ते भाजपच्या वाटेवर आहेत. इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांचे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कॉंग्रेसकडे राहील. त्यामुळे पाटील यांच्या पराभवासाठी रान पेटविणारे श्री. भरणे यांना पुन्हा नवा मार्ग शोधावा लागेल हे निश्‍चित !

कोल्हापूरचे 'राष्ट्रवादी'चे खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडीक यांनीही भाजपच्या मित्रत्वाचा फायदा घेतला. यंदा काही वेगळा विचार करण्याआधीच "राष्ट्रवादी'ने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यांच्याप्रमाणेच साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याही बाबतीत "राष्ट्रवादी'ने वेळेआधीच निर्णय घेतला. त्यामुळे अन्य पक्षांच्या गळाला लागण्यापूर्वीच या दोघांना "राष्ट्रवादी'ने बांधून घेतले. नाहीतर ही मंडळी बांधावर उभीच होती. एकेकाळचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रतापराव भोसले यांचे वारस मदन भोसले यांनी कॉंग्रेस पक्षाला सरळ राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करून बांधावरून खाली उडी घेतली.

मूळचे भाजपचे असलेले गोपीचंद पडळकर व उत्तम जानकर यांनी धनगर आरक्षणाचा लाभ देणाऱ्या पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचा मार्ग काय राहील, याकडेही लक्ष लागले आहे. "स्वाभिमानी' पक्षाकडून सरकारविरोधात राज्यभर रान पेटविणारे सदाभाऊ खोत यांनी भाजपला समर्थन देत मंत्रिपदाचा लाभ उठविला. निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना विरोध करण्यासाठी फलटण येथील सभेत राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांनी शरद पवार यांच्या सभेतच बंडाचे निशाण फडकाविले. एकूणच निवडणुकीचे वातावरण पेटू लागल्याने मावळे आणि कावळे कोण हे स्पष्ट होऊ लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com