खरिपासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर, भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

खरिपाच्या तयारीच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या आहेत. संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा पुरवठा वेळेत होणे आवश्‍यक आहे.
खरिपासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर, भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : लॉकडाऊनमुळे खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके (कृषी निविष्ठा) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.

त्यासाठी कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून कार्यवाही करताना कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर समन्वयक म्हणून काम पाहावे. 

त्याद्वारे 31 मे पूर्वी या निविष्ठांचा पुरवठा शेतकऱ्यांना होईल, असे नियोजन करावे, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

खरिपाच्या तयारीच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या आहेत. संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा पुरवठा वेळेत होणे आवश्‍यक आहे.

हे लक्षात घेऊन कृषी विभागाच्या समन्वयाने कृषी निविष्ठांचा पुरवठा कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यामुळे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही. आणि त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखणे शक्‍य होईल, असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले. गाव पातळीवर कृषी निविष्ठा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील गटांकडे नोंदणी करावी. आत्मा अंतर्गत नोंदणी झालेल्या गटांकडेच नाव नोंदवावे. 

शेतकऱ्यांनी त्यांच्या नावासह संपूर्ण तपशील (पत्ता, गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, ज्या कृषी सेवा केंद्रामधून निविष्ठा खरेदीसाठी त्यांचे नाव आणि आवश्‍यक निविष्ठा) यांची मागणी गटाकडे नोंदवायची आहे.

यासाठी क्षेत्रिय स्तरावरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील. सोबतच ते वाहतुकीकरता आवश्‍यक असणारे परवाने गटांकरीता उपलब्ध करून देतील, असेही त्यांनी सांगितले.

पारदर्शकतेसाठी समन्वय
शेतकरी गट प्रमुख नोंदणीनुसार बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करतील. खरेदीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी. यासाठी कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये समन्वय घडवून आणतील.

शेतकऱ्यांना वाजवी असणाऱ्या दरातच खरेदी करावी, अशा सूचना कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिल्या आहेत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com