तावडेंबद्दल फडणविसांचा निष्ठूर विनोद!

मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत कधीकाळी असलेल्या विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीचेही तिकिट यंदा मिळू शकले नाही. अनेकांना तिकिट देणाऱ्या तावडेंवर ही वेळ का आली?
तावडेंबद्दल फडणविसांचा निष्ठूर विनोद!

पुणे : ही घटना आहे 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळची. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होणार असल्याचे जवळपास निश्चित होते. हडपसर या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने भाजपचे एकमेव नगरसेवक असलेले योगेश टिळेकर हे आपल्याला विधानसभा निवडणुकीचे तिकिट मिळणार नाही, असे गृहित धरून चालले होते. हेच टिळेकर अर्ज भरायच्या काही दिवच आधीच तिरूपती बालाजीला जाणार होते. तेवढ्यात त्यांना विनोद तावडे यांचा फोन आला. तावडेंनी टिळेकरांना सांगितले की अर्ज भरायची तयारी कर. तुला विधानसभेला उभं राहायचयं, असं तावडेंनी सांगितल्यावर टिळेकर यांचा विश्वासच बसत नव्हता. तावडेंनी असाच फोन वडगाव शेरीतून निवडणूक लढवावी की न लढवावी, अशा संभ्रमावस्थेत असलेल्या जगदिश मुळीक यांनाही केला. युती तोडण्याची घोषणा होण्याआधी तावडे असे बरेच फोन करत होेते. अनेकांना निवडणुकीला उभे करत होते. युती तुटणार असल्याने भाजपची तशी तयारी नव्हती. पण पश्चिम महाराष्ट्रातील बरीच जबाबदारी तावडेंनी सांभाळली.

पण बरोब्बर पाच वर्षांनंतर स्वतः तावडे फोनची वाट पाहत होते. खरं तर अशा फोनची वाट पाहण्याचीही गरजही त्यांना नव्हती. तरी ती वेळ आली. मोबाईल फोनची रिंग आता वाजेल, अशा प्रतिक्षेत असताना तावडे यांना तो फोन आलाच नाही आणि बोरीवली मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्याचे स्पष्ट झाले.

भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य असलेल्याचे तिकिट रद्द होणे, हा मोठा धक्का होता. तिकिट वाटपाच्या कोणत्याच प्रक्रियेत ते नव्हते. फडणवीस इतकी मोठी शिक्षा देतील, अशी अपेक्षा त्यांना नव्हती. माजी संसदिय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या `विधानगाथा` या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील एक प्रसंगी. फडणवीस यांच्यासह अनेक माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. गिरीश बापट हे खासदार झाल्याने त्यांच्याकडील संसदीय कामकाज खाते हे तावडेंकडे नुकतेच आले होते. या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांना टोला मारला. `संसदिय कामकाजमंत्री हा मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातला असावा लागतो. पाटील यांनी हे खाते सांभाळताना अनेक मुख्यमंत्र्यांचा विश्वास कमावला. सध्याचे मला माहीत नाही,``असे वक्तव्य चव्हाण यांनी केले होते. यावर फडणवीस यांनी तावडे हे देखील आपल्या विश्वासातील असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

मात्र तसे नव्हते, हे तावडे यांना तिकिट नाकारल्यानंतर स्पष्ट झाले आहे. तावडे आणि फडणवीस यांच्यातील खरे युद्ध कधी सुरू झाले, याबद्दल अनेक वदंता आहेत. त्यातील एक वदंता सत्तेच्या वर्तुळात चर्चेिली जाते ती मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळची. तेव्हा फडणवीस यांना शिवसेनेला अंगावर घेतले होते. शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात घेण्याचे त्यांनी पूर्ण नियोजन केले होते. मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात आली असती तर फडणवीस हे सुपर सीएम झाले असते. मात्र या नियोजनात तावडे यांनी काही घोळ घातला आणि त्यामुळे  फडणविसांचे स्वप्न भंग पावले, अशी चर्चा सुरू असते.  तावडे समर्थकांनी भाजपच्या हक्काच्या जागा पाडून हा जाणूनबुणून अपघात केल्याचे मत फडणवीस गटाचे झाले. मुंबई महापालिका ही शिवसेनेची जीवनवाहिनी आहे. ती तोडण्याचा मूळचा मनसुबा हा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा होता. फडणविसांना शह देण्याच्या नादात तावडे यांनी खरे तर अमित शहांच्या अधिकाराला आव्हान दिल्याची चर्चा तेव्हा होती. 

तेव्हापासून फडणवीसांच्या डोक्यात तावडे गेले असावेत. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ खात्याच्या बदल्यात तावडेंकडील वैद्यकीय शिक्षण खाते हे फडणविसांनी आपल्या विश्वासातील गिरीश महाजन यांना दिले. तेथून तावडे यांचे पंख कापणे सुरू झाले. नंतर तावडेंच्या खात्यातील काही बाबी फडणविसांच्या कानावर गेल्या. त्यानंतर आशिष शेलार यांना तावडेंकडील शिक्षण खाते देण्यात आले. आता तर तिकिटही नाकारले. 

तावडे हे विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. अजित पवार यांच्या खालोखाल त्यांचेच मताधिक्य होते. संघटनेत त्यांचे वर्चस्व होते. महाराष्ट्राचा शिक्षणातील 16 वा क्रमांक हा तिसऱ्यावर आपल्या कारकिर्दीत आल्याचे फडणवीस सांगत असतात. हे शिक्षण खाते तावडे बराच काळ सांभाळत होते. मराठा आंदोलनात चंद्रकांत पाटील यांच्या खालोखाल तावडे यांनी सरकारची बाजू लावून धरली होती. पक्षात इतकी वाईट वेळ आपल्यावर येईल, असे त्यांना स्वप्नातही वाटत नसावे.

सत्तास्पर्धेचा खेळ हा निष्ठूर असतो. फडणवीस या स्पर्धेत दिवसेंदिवस भक्कम होत गेले. त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पूर्ण पाठिंबा असल्याने त्यांच्यासोबतचे स्पर्धेतून कधीच मागे पडले. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. त्यातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, विष्णू सवरा आणि दिलीप कांबळे या चौघांचा या निवडणुकीतील पत्ता कट झाला. फडणविसांसोबत शपथ घेतलेल्या पंकजा मुंडे आणि विद्या ठाकूर यांनाच पुन्हा तिकिट मिळाले. जे पहिल्या रांगेतील नेते होते, ते असे बाहेर फेकले गेले. तावडे यांना दिल्लीत कोणी गाॅडफादर नसल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले. ते आता या खेळाची बाजी पलटविण्याच्या प्रयत्नात असतील. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, या म्हणीचा आधार त्यांना असेल. तोपर्यंत फडणविसांनी हा निष्ठूर विनोद का केला असावा, याचेही उत्तर त्यांना शोधावे लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com