केंद्र सरकार मूर्ख, कसलाही विचार करत नाही ! ,कन्नन गोपिनाथन यांचा घणाघात

केंद्र सरकार मूर्ख, कसलाही विचार करत नाही ! ,कन्नन गोपिनाथन यांचा घणाघात

मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्यांना लोक फॅसिस्टवादी म्हणतात; मात्र त्यांना फॅसिस्टवाद समजून घेण्याची समज तरी आहे का, असा प्रश्‍न "कलम 370' रद्द केल्यावर राजीनामा देणारे आयएएस अधिकारी कन्नन गोपिनाथन यांनी उपास्थित केला आहे.

हे सरकार मूर्ख असून कोणत्याही परिणामांचा विचार न करता लोकांवर निर्णय लादत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीमध्ये लोकांनी सरकारला प्रश्‍न विचारायला हवेत. इथे मात्र सरकारच लोकांना प्रश्‍न विचारत असल्याने त्याविरोधात जनआंदोलन उभारून सरकारला उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दादरच्या श्रमिक कार्यालयात "फ्रेंड्‌स ऑफ डेमोक्रॅसी'तर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी कन्नन बोलत होते. ते म्हणाले, हे सरकार फॅसिस्टवादी असल्याचे म्हटले जाते, पण मला हे सरकार मूर्ख असल्याचे वाटते. सरकारला मुस्लिमांचा द्वेष आहे, मग नोटबंदीवेळी त्यांना कोणाचा राग होता, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

सरकारने सर्व नागरिकांवर जीएसटी लावल्यामुळे या सरकारला काय करायचे तेच कळत नाही. हे सरकार मूर्ख असून त्यांना चांगल्या गोष्टी ऐकायची ताकत नसल्याने त्यांनी शहाण्या माणसांना देशाबाहेर जायला भाग पाडले, असा आरोप कन्नन यांनी केला. आज कोणी सरकारविरोधात बोलले तर त्याला देशद्रोही ठरवले जाते हे योग्य नाही. आपल्याला एक असा देश बनवायला हवा ज्यात सर्व जण आपले म्हणणे मांडू शकतात, असे कन्नन म्हणाले. 

अमित शाह यांनी पुढील वर्षी जनगणना होणार असल्याचे घोषित केले. हा नागरिकत्व सुधारणा कायद्याचा एक भाग आहे. सरकारी कर्मचारी येत्या काही दिवसांत लोकांच्या घरी येऊन जनगणना करणार आहेत. त्यामध्ये तुम्ही भारतीय नागरिक आहात की नाही याची नोंद केली जाईल. त्यामधून "एनआरसी'ची पहिली यादी तयार केली जाणार असल्याचे कन्नन यांनी सांगितले. 

नोटबंदीवेळी सरकारने बॅंकांसमोर रांगा लावायला लावल्या. आता "एनआरसी'साठी रांगा लावायला लावणार आहेत. आमचेच लाखो, करोडो रुपये खर्च करून आम्हालाच नागरिकत्व दिले जाईल, हा कुठला प्रकार आहे असा प्रश्‍न विचारत बेघर, आदिवासी, गरिबांना याचा त्रास होणार आहे. हा कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असे कन्नन यांनी सांगितले. 

...म्हणून राजीनामा दिला ! 
कलम 370 रद्द केले तेव्हाच हा इशारा होता. त्याच वेळी लोक माझ्यासोबत उभे राहिले असते तर आज ही वेळ आलीच नसती. कलम 370 रद्द झाल्यावर सर्वच गप्प बसले आहेत. सर्वांना गप्प करून दहशत पसरवली आहे. लोकांचे गप्प राहणे हे देशासाठी घातक आहे. यामुळे देशातील लोकशाही धोक्‍यात येऊ शकते. तरीसुद्धा लोक बोलायला तयार नसल्याने मी राजीनामा देऊन याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com