'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेनंतर राजकारणातुन लोकसेवा करणार : डॉ. अमोल कोल्हे

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रिकेटपटूंप्रमाणे आपण मालिकाविश्‍वातून निवृत्ती घेणार आहोत. यापुढे राजकारणात सक्रीय होऊन लोकसेवेवर आपला भर असेल, अशी घोषणा नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे केली.
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेनंतर राजकारणातुन लोकसेवा करणार : डॉ. अमोल कोल्हे

मालेगाव : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रिकेटपटूंप्रमाणे आपण मालिकाविश्‍वातून निवृत्ती घेणार आहोत. यापुढे राजकारणात सक्रीय होऊन लोकसेवेवर आपला भर असेल, अशी घोषणा नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे केली. येथील श्री सयाजीसृष्टी जन्मोत्सव समितीतर्फे येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या समारंभात डॉ. कोल्हे यांना सयाजीरत्न आणि राष्ट्रमाता जिजाऊरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी कोल्हे यांना श्री सयाजीरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी सत्कार समारंभात आयोजकांनी डॉ. कोल्हे यांना आपण आता सयाजी राजांवर दुरचित्रवाणी मालिका करा, असा आग्रह धरला. त्या अनुषंगाने डॉ. कोल्हे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर आपण निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. यापुढे राजकारणात अधिक सक्रिय राहत लोकसेवेच्या कामावर भर देण्याचा संकेतही त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात दिला. देशात रयतेचे लोककल्याणकारी राज्य निर्माण करणारे लोकोत्तर राजे राष्ट्रपुरुष महापुरुषांचे पुतळे उभारू नका. त्यांना जात, पात, धर्म, भाषा, प्रांत यांच्या चौकटीत बांधू नका. त्यांचे विचार समाजात व मनामनात रुजवा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. कोल्हे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यापाठोपाठ रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे काम महाराजा सयाजीराव गायकवाड, अहिल्याबाई होळकर आणि राजर्षी शाहू महाराज यांनी केले. सयाजीराव आधुनिक भारताचे जनक होते. प्रांतांच्या सीमा त्यांना थिट्या पडतील. रयतेचे लोककल्याणकारी राज्य निर्माण करणाऱ्या महाराजा सयाजीराव यांच्या नावाने सयाजीरत्न पुरस्कार मिळतो हे मी माझे भाग्य समजतो. पुरस्काराची रक्कम सयाजीसृष्टीला देतो. हा पुरस्कार माझा नसून स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. सयाजी महाराजांवर मालिका करण्याचा विचार करू." मात्र थेट शब्द देत नाही. कारण शब्द दिला की त्याचे पालन करायला हवे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या वेळी महाराजा सयाजीराव यांच्या अर्धपुतळ्याचा राज्याभिषेक करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बारा अधिकाऱ्यांच्या मातांना राष्ट्रमाता जिजाऊरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी युवराज्ञी आशाराजे गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. आमदार सुधीर तांबे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकर, संजय हिरे, साहित्यक बाबा भांड, आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com