राजकारण व अभिनय या दोन्ही मोठ्या जबाबदाऱ्या - अभिनेते व खासदार डाॅ. अमोल कोल्हे

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे गाजलेले अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी दिलेली ही खास मुलाखत खास 'सरकारनामा' च्या वाचकांसाठी
Amol Kolhe Interview to Sakal
Amol Kolhe Interview to Sakal

ऐतिहासिक आणि संवेदनशील विषयावर मालिका सुरू करताना काय विचार होता? त्यामध्ये काय अडचणी आल्या अन्‌ त्यावर मात कशी केली?
- 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका जेव्हा सुरू करायची ठरली, त्या वेळी हा विषय ऐतिहासिक आहे, हे सर्वांनाच माहीत होते. पण, तो संवेदनशील असल्याचे वारंवार म्हटले गेले, अनेकांनी त्याविषयी भीतीही दाखविली. अनेकांनी तर हा विषय यशस्वी होऊच शकत नाही, अशीही भीती घातली. पण, साधी गोष्ट कायम वाटते की, तुमचा हेतू शुद्ध असेल अन्‌ तुम्ही प्रामाणिक असाल, तर तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाने मी अनेक वर्षे झपाटलो होतो. आठ-नऊ वर्षे मी सगळीकडे फिरत होतो. त्यामुळे हे करायचेच, ही खूणगाठ मनामध्ये बांधली होती. सुदैवाने 'झी मराठी'कडून ती संधी मिळाली अन्‌ आमच्या संपूर्ण टीमनेही ही गोष्ट लक्षात ठेवली होती, की हेतू शुद्ध असला पाहिजे अन्‌ जेव्हा आम्ही शुद्ध हेतूनेच त्यात हात घातला, त्या वेळी त्यामध्ये कोणतीही अडचण राहिली नाही. खरे तर आर्थिक अडचण, आर्थिक चणचण होती. पण, वेळेनुसार त्यावरही मात होत गेली. त्यातून ही कलाकृती उभी राहिली. महाराष्ट्रातील सगळ्यात कौतुक मला या गोष्टीचे वाटते, की ज्या विषयांच्या बाबतीत अनेकांच्या मनामध्ये अनेक शंका होत्या; पण संभाजी महाराजांच्या इतिहासाने यावर मात केली. आजही महाराष्ट्राच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज अधिराज्य गाजवत आहेत. आणि तो इतिहासही इतका तेजस्वी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अनेक पूर्वग्रह आणि मिथक प्रचलित आहेत. मालिका साकारताना यांना छेद कसा दिला?
- मुळात आपल्या इतिहासाविषयीची सर्वांत अडचण ही आहे, की आपल्या इतिहासात डॉक्‍युमेंटेशन खूपच कमी आहेत. मूळ मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास फार मोठ्या संघर्षाचा आहे. शिवकालीन पुरावे पाहायला गेलो, तर शिवभारत हे पन्हाळ्याच्या वेढ्याला संपते. एक जेधे शकायली येथे, तर त्यानंतर येते ती सभासदांची बखर. ही बखर संभाजी महाराजांच्या कालखंडानंतर लिहिली गेली. आणि त्यानंतर दीडशे-पावणेदोनशे वर्षांनी लिहिलेली मल्हार रामभाऊ चिटणीसांची बखर येते. हे सोडून बऱ्याचदा मुघल बखरकार येतात. त्यामध्ये खाफी खान असेल, ईश्‍वरदास नागर असेल, भीमसेन सक्‍सेना असेल किंवा काही इंग्रज इतिहासकारांनी लिहिण्याचा प्रयत्न केला; त्याच्यातून तुकडे जोडून एक कोलाज बनवावा लागतो आणि इतिहासाकडे बघताना मला वाटते की, तर्कसंगत दृष्टिकोनातून जेव्हा इतिहासाकडे बघितले जाते, तेव्हाच खरे चित्र समोर येते. केवळ अभिनिवेशातून जर बघण्याचा प्रयत्न केला, तर इतिहासाचे कायमच एक खोटे चित्रे उभे राहू शकते. तर्कसंगत नीरक्षीरविवेकबुद्धीने जर इतिहासाकडे पाहिले, तर त्याचा फायदा होता. खरे तर मालिकेबाबत अनेक गोष्टी होत्या. याबाबत आमच्या मालिकेचे लेखक प्रतापराव गंगावणे यांचे मनापासून आभार मानेन. कारण, अनंत गोष्टींचे दडपण असताना, वेगवेगळ्या समाजघटकांचा दबाव असताना त्यांनी निर्भीडपणे याचे लेखन केले, त्याचे त्यांना फार मोठे श्रेय आहे. आणि "झी मराठी'चेही मनापासून आभार की, त्यांनी कोणत्याही गोष्टीच्या दबावाला बळी न पडता जे आपल्याच बुद्धीला पटतेय, जे आपल्या सदसद्विवेकबुद्धीला पटतेय, ते महाराष्ट्राला दाखविण्याचा प्रयत्न केला. आणि महाराष्ट्रातील रसिकांचेही आभार मानेन, की त्यांनी ते गोड मानून घेतले अन्‌ त्यांना ते पटले.

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेचा उद्देश साध्य झाला, असे वाटते का?
- आत्ताशी मालिका संपली आहे. त्यामुळे उद्देश साध्य झाला की नाही, हे कळण्यासाठी काही वर्षे जावी लागतील. जेव्हा मला पुन्हा एकदा बुकस्टॉलमधील आजचा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुस्तकांवरील जो काही खप आहे, हा खप असाच दिसेल जेव्हा किल्ल्यांकडे वळणारी पावले पुन्हा एकदा तितक्‍याच संख्येने वळत राहतील, जेव्हा पुन्हा एकदा मुलाचे नाव संभाजी ठेवण्यासाठी पालकांमध्ये चढाओढ लागेल, जेव्हा "छत्रपती संभाजी महाराज की...' म्हटल्यानंतर जय म्हणणारे नाही, असे नरडं महाराष्ट्रात राहणार नाही अन्‌ जेव्हा जर कोणी म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांविषयी पूर्वग्रहदूषित इतिहास समोर आला, त्याला "छावा' कोण होता, हे तिथल्यातिथे सांगितले जाईल, तेव्हा आपला उद्देश पूर्ण होईल. पण, मुळात ही सुरुवात आहे. छत्रपती संभाजी महाराज असोत वा छत्रपती शिवाजी महाराज असो, यांच्यावर आपल्याकडे खूपच कलाकृती आल्या आहेत, असे मी कायम नमूद करतो. या कलाकृती वेगवेगळ्या अँगलमधून, वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूमधून ही व्यक्तिमत्त्वे समोर येत राहिली पाहिजेत. तरच, ती पुढच्या पिढीला समजत राहतील अन्‌ एकेका टप्प्यानंतर त्यांच्या नक्की कुठल्या तत्त्वावर आपल्याला लक्ष द्यायचे आहे अनं त्यांच्यापासून नक्की कोणती प्रेरणा घ्यायची आहे, हे प्रत्येक माणसाला हळूहळू समजायला लागेल. त्यामुळे आणखी कलाकृती समोर आल्या पाहिजेत.

महाराष्ट्राला या मालिकेने काय दिले, असे तुम्हाला वाटते.
- मला वाटते महाराष्ट्राला काय दिले, यापेक्षा महाराष्ट्राने या मालिकेला खूप काही दिले आहे. कारण, महाराष्ट्र ही इतकी मोठी गोष्ट आहे, त्याला आपण काय देणार? पण, 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने पुन्हा एकदा एका सोनेरी पानावर जी बदनामीची धूळ साचली होती, त्या धुळीवर आपल्यापरीने का होईना फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

मालिका खूप लोकप्रिय झाली. नेमके कारण काय सांगाल?
- छत्रपती संभाजी महाराज हाच विषय मालिका लोकप्रिय होण्याचे मूळ कारण आहे. कारण, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात असलेले प्रेम आणि त्या विषयाला हात घालताना "झी टीव्ही'च्या संपूर्ण टीमने, त्याचबरोबर लेखक प्रताप गंगावणे, दिग्दर्शक कार्तिक केंडे, पार्टनर विलास सावंत, डॉ. घनश्‍याम राव, सगळेच कलाकार असतील, या प्रत्येकाने या विषयाला शुद्ध हेतूनेच हात घातला आणि शुद्ध हेतूने ज्या वेळी आपण हात घालतो, त्या वेळी त्याच्यामध्ये अपयश नसते. मालिकेच्या संपूर्ण यशाचे श्रेय महाराष्ट्रातील मायबाप रसिकांचे आहे.

मालिकेतून तुमच्या आयुष्यात काय बदल झाले? नेमके प्रसंग सांगा.
- "स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमुळे माझे विरोधक म्हणतात, मी खासदार झालो. खरे तर या मालिकेमुळे खूपच बदल झाला आहे. यातील काही प्रसंग हे डोळे पाणावणारे होते. मला आठवते की, माझ्या आयुष्यात एक प्रसंग अत्यंत वाईट असा होता. माझे वडील दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये गेले आणि वडील गेल्यानंतर तीन दिवसांनी मी स्क्रीनप्ले बोर्डावर लिहित होतो आणि ज्यामध्ये महाराजांच्या जाण्याचा आणि संभाजी महाराजांच्या वियोगाचा विचार होता. मी लिहीत होतो, माझी पाठ होती अन्‌ डोळे पाण्याने डबडबलेले होते आणि पाठीमागून आमच्या ईपी आणि पार्टनर घनश्‍याम बोलत होते, की काय नशीब असू शकते कोणाचे. कारण, तेच मी लिहीत होतो, तेच अनुभवत होतो अन्‌ तेच भोगत होतो. संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना मला उफाळण्याचे आवडते अन्‌ उसळणे जास्त आवडते. कारण, पुढच्या पिढीला इतिहास समजला पाहिजे, हे कारण अन्‌ धोरण माझे कायमच असते. या मालिकेने खूप समृद्ध केले. पडेल त्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी या मालिकेमुळे आली. अनेक धमक्‍या आल्या. अनेक गोष्टी घडल्या. प्रत्येकाचे एक वेगळे प्रेम होते. त्या प्रेमापोटी त्यांनी त्या गोष्टी केल्या.

 लोकसभा निवडणुकीत या मालिकेचा फायदा झाला, असे आरोप झाले. याबद्दल काय वाटतं?
- 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमुळे मला लोकसभा निवडणुकीत नक्कीच फायदा झाला. फायदा झाला अशा प्रकारचे आरोप झाले, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण, ही माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. जर मी माझा व्यवसाय करतो, तर तो मी उजळ माथ्याने करतो. यामध्ये मी चोरी-चपाटी काही केलेले नाहीये. इमानेइतबारे जी गोष्ट केली आहे, त्याला मी आरोप मानत नाही. या भूमिकांमुळे एक जबाबदारी येते. तुम्हाला त्या अपेक्षा त्या पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी असते. मला ती जबाबदारी जास्त महत्त्वाची असते.

राजकारण आणि अभिनेता ही कसरत सध्या कशी साध्य करताय?
- राजकारण अन्‌ अभिनय ही खूपच मोठी जबाबदारी आहे. कारण, ही मालिका संपल्यानंतर मी पुन्हा मालिका करणार नाहीये. कारण, टीव्ही मालिका केल्यानंतर तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळे मी मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण, ही कसरत काही काळासाठी नक्कीच थांबेल.

 तुम्ही फक्त संभाजी महाराज व शिवाजी महाराज यांच्याभोवती कलाविश्‍व निगडित ठेवले? याच्यापलीकडे जाणार का?
- संभाजी महाराज व शिवाजी महाराज यांच्या पलीकडेही जाण्याचा मी प्रयत्न केला आहे. कारण, आपल्या साहित्यामध्ये अशा काही व्यक्तिरेखा आहेत, ज्यात शाहीर अण्णा भाऊ साठे यांचा 'फकिरा' साकारायला आवडेल, महात्मा जोतिराव फुले साकारायला आवडतील, पेशव्यांच्या इतिहासातील सदाशिवराव भाऊही साकारायला आवडतील. या काही गोष्टी मला नक्कीच साकारायला आवडतील.

रंगभूमीवरून तुम्ही अभिनयात पुढे आलात? आता नाटक करावेसे वाटत नाही का?
- खरे तर नाटकांना चांगले दिवस की वाईट दिवस, हे बाजूला ठेवून आज मी एक महानाट्याचा फार मोठा प्रकार करतो आहे. या महानाट्याला 15 ते 20 हजार प्रेक्षक बघायला येतात. त्याला एक शिवकालीन गाव व शिवसृष्टीची जोड देऊन एक वेगळा प्रयोग करीत आहोत. याचे प्रयोग अमरावती, रोहा येथे झाले आहेत. आता परळी, अकोला, चिपळूण अन्‌ पुणे येथेही याचे प्रयोग होणार आहेत.

सध्याची तरुणाई वेबसीरिजकडे वळत आहे. शिवाजी महाराजांवर वेबसीरिज सुरू करण्याचा तुमचा मानस आहे का?
- शिवाजी महाराजांवरील तीन चित्रपटांची घोषणा मी 'शिवप्रताप' या नावाने केली आहे. मोठ्या पडद्यावरून महाराजांविषयी काही गोष्टी जातील. त्याचबरोबर वेबसीरिजच्या माध्यमातूनही काही गोष्टी नक्कीच डोक्‍यात आहेत. पण, अगोदर शिवप्रताप हातावेगळे करेन. त्यानंतर हे तीन चित्रपट हातावेगळे करेन. त्यानंतर संभाजी महाराजांविषयी चित्रपट येतील आणि मध्ये वेळ मिळाला तर वेबसीरिज करेन. मात्र, छोट्या पडद्यावरून ब्रेक घेणार आहे. कारण, एपिसोडिक भागांसाठी खूप वेळ द्यावा लागतो. तो वेळ मला देता येणार नाही. मात्र, अभिनय हे स्वतःचे एक्‍सप्रेशन असते. या माध्यमातून मला जेव्हा एक्‍स्प्रेस व्हायला वाटते, त्या वेळी मी नक्कीच एक्‍स्प्रेस होईन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com