वळसे-आढळराव एकत्र आले, जेवले; मात्र 'पराग प्रश्न' विसरले

खाजगी कारखान्यावरुन मोठ्या तावातावाने भांडणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव आढळराव हे रांजणगाव-गणपती (ता.शिरूर) येथे एका लग्नसमारंभात चक्क एकत्र जेवले. गेल्या आठवड्यात एकमेकांशी तावातावाने भांडणा-या या नेत्यांनी एकमेकांना यावेळी 'हाय-बाय' केले. मात्र बैलगाडा शर्यतींचा विषयाबाबत आणि मुळ वादाचा विषय असलेल्या पराग अ‍ॅग्रो खाजगी कारखान्याच्या प्रश्नाबाबत मात्र सोयिस्कर मौन साधल्याने उपस्थित मात्र चक्रावले.
वळसे-आढळराव एकत्र आले, जेवले; मात्र 'पराग प्रश्न' विसरले

शिक्रापूर : खाजगी कारखान्यावरुन मोठ्या तावातावाने भांडणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव आढळराव हे रांजणगाव-गणपती (ता.शिरूर) येथे एका लग्नसमारंभात चक्क एकत्र जेवले. गेल्या आठवड्यात एकमेकांशी तावातावाने भांडणा-या या नेत्यांनी एकमेकांना यावेळी 'हाय-बाय' केले. मात्र बैलगाडा शर्यतींचा विषयाबाबत आणि मुळ वादाचा विषय असलेल्या पराग अ‍ॅग्रो खाजगी कारखान्याच्या प्रश्नाबाबत मात्र सोयिस्कर मौन साधल्याने उपस्थित मात्र चक्रावले.  

रावडेवाडी (ता.शिरूर) येथे शिवनेरी या खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या खाजगी साखर कारखान्याला सहा वर्षांपूर्वी परवानगी मिळू दिली नाही असा आरोप आढळराव यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यावर मागील आठवड्यात केला. अर्थात त्याच रावडेवाडीत नुकताच सुरू झालेला 'पराग अ‍ॅग्रो' हा खाजगी साखर कारखाना वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांचा असल्याचे आढळराव यांनी जाहिर करीत दोन्ही नेत्यांनी मागील आठवड्यात सकाळ व 'सरकारनामा'च्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा गाजविला.

या वादात खासदार शिवाजीराव आढळराव यांनी 'वळसे पाटील यांनी पराग कारखाना आपल्या मेहुण्याचा आहे की, नाही ते जाहिर करावे असे थेट आव्हान दिल्यावर मात्र वळसे पाटलांच्या बाजुने मौन पाळले गेले ते आजपर्यंत. या वादाच्या निमित्ताने आंबेगावात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सध्या चांगलीच जुंपली असून घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे नुकत्याच झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या निमित्ताने त्याचे पडसाद उमटले.

दरम्यान शनिवारी (दि.२५) रांजणगाव-गणपती येथे एका विवाह समारंभाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र आले. हेच निमित्त साधून काही कार्यकर्त्यांनी वळसे पाटील यांना बैलगाडा शर्यती कधी सुरू होणार असे विचारले. याबाबत वळसे पाटील यांनी तत्परतेने हा प्रश्न खासदार शिवाजीराव आढळराव यांना विचारा, असे म्हणत प्रश्नाचा चेंडू पुढे ढकलला. अर्थात त्याच तप्तरतेने खासदार आढळराव यांनीही बैलगाडा शर्यतींचा चेंडू थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे ढकलला.

हे सर्व घडत असताना गेल्या आठवडाभर या दोन्ही नेत्यांनी ज्या प्रश्नावर जिल्हाभर रणकंदन माजविले त्या 'पराग अ‍ॅग्रो'च्या प्रश्नाबाबत मात्र सोयिस्कर मौन साधले. दरम्यान, याच प्रश्नामुळे आंबेगावात सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडण्यापर्यंत जात असून त्याचा प्रत्यय नुकताच पंचायत समितीच्या शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे वेळी घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे आला असतानाही दोन्ही नेते मात्र एकत्र आल्यावर वादाच्या प्रश्नावर मौन पाळतात हेच ते राजकारण.

यावेळी सरपंच सुरेखाताई नानासाहेब लांडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिवसेनेचे युवा पदाधिकारी बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य विश्वास कोहकडे, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब लांडे आदींसह राष्ट्रवादी व शिवसेनेचे बरेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, नेतेच वादाच्या प्रश्नावर बोलत नसल्याने कार्यकर्त्यांनीही सोयिस्कर मौन साधले आणि या सर्व मौनाने उपस्थित मात्र जाम चक्रावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com