दिलीप गांधी आमचे नेते होते, आहेत आणि राहतीलही.....

दिलीप गांधी आमचे नेते होते, आहेत आणि राहतीलही.....

नगर : "लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने संघटन कौशल्यावर निवडणूक जिंकली. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. काही मंत्र्यांचा अपवाद वगळता, कोणावरही आरोप झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होईल,'' असा विश्‍वास महाराष्ट्र प्रभारी, तथा खासदार सरोज पांडे यांनी आज व्यक्‍त केला.

भाजप कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी पांडे आज येथे आल्या होत्या. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, "लोकसभा निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीवर विश्‍वास, अमित शहा यांचे संघटनकौशल्य आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम त्यासाठी महत्त्वाचे वाटतात. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात भाजपचे चार हजार पूर्ण वेळ कार्यकर्ते पक्षाच्या विचारांचा प्रचार-प्रसार करीत होते.'' 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर बैठका घेणार असल्याचे स्पष्ट करून पांडे म्हणाल्या, "विधानसभेत भाजपचे 122 आमदार आहेत. त्या जागांसह अन्य ठिकाणीही भाजपचे उमेदवार निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. युतीचा उमेदवार असेल, तेथेही भाजप कार्यकर्ते जिंकण्यासाठी जोर लावतील. अन्य पक्षांत भविष्य नसल्याने नेते, पदाधिकारी भाजपमध्ये येत आहेत. राष्ट्रवादाच्या मुद्‌द्‌यावर पक्षात येणाऱ्यांचे स्वागत आहे. दबाव टाकून कोणालाही पक्षात घेतले जात नाही.''

माजी खासदार दिलीप गांधी यांच्याबद्दल पांडे म्हणाल्या, की "दिलीप गांधी आमचे नेते होते, आहेत आणि राहतील. पक्ष प्रत्येकाला संधी देत असतो.' या वेळी पालकमंत्री राम शिंदे, सुनील रामदासी उपस्थित होते. 

जागावाटप निश्‍चित नाही 
भाजप-शिवसेना महायुती होती, तशीच पुढेही राहील. जागावाटपाचे अद्याप ठरलेले नाही. वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन जागावाटप होईल, असे पांडे म्हणाल्या. 

कॉंग्रेस फक्त "वर्किंग पार्टी' 

पांडे म्हणाल्या, ""महाराष्ट्र कॉंग्रेसची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. त्यात कार्यकारी अध्यक्षांची संख्याच जास्त आहे. त्यामुळे कॉंग्रेस "वर्किंग पार्टी' झाली आहे. राष्ट्रीयस्तरावरील नेते म्हणतात, "आमच्याकडे नेतृत्व नको.' पदाधिकारी राजीनामे देत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकारणात अनेक वर्षे केवळ गांधी नावावर चालले; परंतु आता जनता योग्यता पाहते.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com