निफाड : भारतात सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात असून नाशिक जिल्ह्यात पहिला रुग्ण हा निफाड तालुक्यात सापडला. व मोठ्या प्रमाणात मालेगाव शहरामध्ये रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. सदरची साखळी रोखण्यासाठी निफाड तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड तालुक्यात भीलवाडा पॅटर्न राबविणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
या भिलवाडा पॅटर्नमध्ये ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट हा जो (3टी) फॉर्म्युला आहे. यासाठी निफाड पंचायत समिती प्रशासनासोबत चर्चा करून संपूर्ण तालुक्यात 800 पेक्षा जास्त लोकांच्या 370 टीम तयार करून ग्रामपंचायत निहाय काम सुरू केले आहे. सदर टीममध्ये आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका / मदतनीस, आरोग्य सेवक, सहाय्यक अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. त्या टीमचे सनियंत्रण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, मुख्य सेविका करणार असून त्याचा अहवाल पंचायत समिती स्तरावर एकत्रित केला जाणार आहे.
सदर सर्वेक्षणसाठी एक सर्वसमावेशक असा तक्ता तयार केला असून त्यामध्ये त्या कुटुंब प्रमुखाची माहिती, प्रमुखाचा मोबाईल नंबर, घरातील एकूण व्यक्ती, घरातील कोणी व्यक्ती परदेशात किंवा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन आली आहेत का?, कोणाला सर्दी, ताप, खोकला, डोके दुखी, घसा दुखी, दम लागणे व इतर असा त्रास आहे का?, कोणी आजारी असेल तर लगेच संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचेकडुन तपासून पुढीलप्रमाणे त्यांच्यावर उपचार करणे व गरज पडल्यास जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्याकडे पाठवित येणार आहे. अशा प्रकारे हे काम चालणार आहे.
या माध्यमातून निफाड तालुक्यातील सर्व जनतेने शासनास सहकार्य करावे, हा सर्व्हे आपल्या उज्वल आरोग्यासाठी होणार आहे. ज्याचा परिणाम हा कोरोना सारख्या महामारीला हरवण्यासाठी सर्वानी सर्व्हेसाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्यावी व सहकार्य करावे असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी केले.
जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी त्यात मालेगांव शहरात संख्या मोठी आहे.मालेगांव शहराचा सामाजिक दुष्टया नाशिक जिल्ह्याचा फारसा संबंध नाही. त्यामुळे मालेगांव शहर कोरोना च्या रूग्णांबाबत स्वतंत्र आकडेवारी प्रसिद्ध करावी, अशी मागणी आमदार बनकर यांनी केली आहे.
या सर्व्हे मध्ये रेशनकार्ड बाबत पण माहिती घेतली जाणार असून महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत धान्यपुरवठा हा पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक करण्यात येणार आहे. परंतु निफाड तालुक्यात असे बरेच कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे अजूनही रेशनकार्ड नाही त्या गरजू कुटुंबियांना या कोरोना कालावधीत विविध संस्थेमार्फत अन्न धान्य पुरवठा करून कोणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. त्याच सोबत भविष्यात त्यांना रेशनकार्ड काढण्यासाठी महाराजस्व अभियान घेऊन रेशनकार्ड देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे आमदार बनकर यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.