`फडणवीस यांच्यासोबत तुमचा मुलगा असताना पापाचा पैसा दिसला नाही का`

...
vijay-wadettiwar-bang
vijay-wadettiwar-bang

चंद्रपूर: राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ समाज सेवक अभय बंग यांनी यावरून शासनावर टीका केली. डॉ. बंग यांच्या टीकेला जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यानिमित्ताने बंग आणि वडेट्टीवार यांच्यात दारूबंदीच्या मुद्यावरून चांगलीच जुंपल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात सन 2015 मध्ये भाजप सरकारने दारूबंदी केली. तेव्हापासून दारूबंदीचे समर्थक आणि विरोधक यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू होते. लोकसभा निवडणुकीत तर हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी होता. दारूबंदीमुळे भाजपला फटका बसले, असा राजकीय जाणकारांचा दावा आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झाले. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महसूलवाढीच्या अनुषंगाने बैठक घेतली. यात चंद्रपूरची दारूबंदी उठवून महसूल वाढीची शक्‍यता चर्चेत आली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण-समाजकारण ढवळून निघाले.

दारूबंदी उठविण्याच्या चर्चेवर डॉ. अभय बंग यांनीही आपली भूमिका जाहीर केली. सरकारने उत्पन्न चांगल्या मार्गाने वाढवावे. दारूपासून मिळणारा पापाचा कर कोणत्याही शासनाने वाढवू नये. दारूबंदीमुळे अवैध दारू वाढली हा शब्दच्छल आहे, असे बंग म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे चंद्रपुरात आगमन झाले. त्यांनीही दारूबंदीच्या नफ्या-तोट्याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमू असे जाहीर केले. याच दिवशी श्रमिक एल्गारच्या ऍड. पारोमिता गोस्वामी यांनीही आपली भूमिका पत्रकार परिषदेतून मांडली. त्यांनी दारूबंदी उठवण्याला विरोध केला.

वडेट्टीवारांनी गांधी चौकातील सत्काराला उत्तर देताना दारूबंदी समर्थकांचा चांगलाच समाचार घेतला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या 'दारूचा पैसा म्हणजे पापाचा पैसा' या वक्तव्यावर वडेट्टीवारांनी मौन सोडले .

डॉ. अभय यांना पापाचा पैसा त्यांचा मुलगा फडणवीस यांच्यासह सहाव्या मजल्यावर बसत असताना दिसला नाही का ? तेव्हा ते का गप्प होते? असा सवाल केला. सत्ता बदलताच डॉ. बंग यांच्या भूमिकेतील बदलाची वडेट्टीवार यांनी जाहीर वाच्यता केली. यानिमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या राजकीय व्यक्तीने डॉ. बंग यांच्या टीकेला तेवढ्याच ताकदीने उत्तर दिल्याचे दिसून आले. येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात "दारूबंदी'हाच विषय केंद्रस्थानी राहणार आहे. त्यामुळे पालकमंत्री वडेट्टीवार आणि डॉ. बंग यांच्यातील शाब्दिक वाग्कयुद्ध पुन्हा बघण्याची संधी चालून येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com