जळगाव : ''धुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या 50 जागा म्हणजे जनतेने आमदार अनिल गोटे यांना दिलेले चोख उत्तर आहे. त्यांना जेमतेम एक जागा वाचविता आली आहे. आता तरी त्यांनी बोध घेवून आरोप बंद करावेत,'' असे अवाहन भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना व्यक्त केले.
धुळे महापालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने 50 जागा मिळवित मोठी आघाडी घेतली आहे. या ठिकाणी सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीला दारूण पराभव पत्कारावा लागला आहे. त्यांना केवळ 14 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपचेच असलेले आमदार अनिल गोटे यांनीही 'लोकसंग्राम' पॅनलव्दारे उमेदवार उभे करून भाजपला आव्हान दिले होते. मात्र, त्यांना केवळ एक जागा मिळाली आहे. त्यांच्या पत्नी हेमा गोटे विजयी झाल्या आहेत.
धुळ्याच्या भारतीय जनता पक्षाच्या यशाबाबत बोलतांना जलसपंदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, ''आम्ही दिलेला जनतेला विकासाचा विश्वास आणि निवडणुकीचे योग्य नियोजन यामुळेच हा विजय मिळालेला आहे. जनतेचा हा विश्वास आम्ही सार्थ ठरविणार आहोत. आम्ही पहिल्याच महिन्यात मुख्यमंत्र्याकडून 200 कोटी रूपये मंजूर करून आणून धुळ्यात विकास कामासह धुळेकरांचा पाण्याचा प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडविणार आहोत."
धुळ्यातील विजय म्हणजे खऱ्या अर्थाने आमदार अनिल गोटे यांना जनतेने दिलेले चोख उत्तर आहे. असे मत व्यक्त करून ते म्हणाले, "त्यांनी 60 जागावर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना जेमतेम एक जागाच वाचविता आली आहे. त्यामुळे जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे. त्यांनी आमच्यावर अगदी खालच्या पातळीवर आरोप केले होते,आमच्यावर गुंडगिरीचा आरोप त्यांनी केला होता. मात्र जनतेने त्यांना आता उत्तर दिलेले आहे. या पराभवातून तरी त्यांनी बोध घ्यावा."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.