नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. अमरावतीला (Amravati) सुरवातीला कोरोना संसर्गाचा मोठा फटका बसला होता. अशा परिस्थितीत अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह (Arti Singh) यांनी खंबीरपणे उचललेल्या पावलांमुळे तेथील संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यांना 'लेडी सिंघम' म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या कामगिरीचे देश तसेच, विदेशातून कौतुक होत आहे.
आयपीएस अधिकारी असलेल्या डॉ. आरती सिंह देशातील प्रमुख 60 शहरांमधील एकमेव महिला पोलीस आयुक्त आहेत. अमरावतीत कोरोनाचा धोका वाढू लागला त्यावेळी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे अतिशय महत्वाचे होते. त्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोरोना विषयक उपाययोजना पटवून देणे गरजेचे होते. आरती यांनी हे आव्हान लीलया पेलले आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा कहर झालेले अमरावती पूर्ववत होऊ लागले.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आरती या रोज बारा तास काम करीत होत्या. रस्त्यावर उतरुन त्या नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत होत्या. याचसोबत त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या शेकडो नागरिकांना त्या मार्गदर्शन करीत होत्या. तसेच, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्यही त्या वाढवत होत्या.
आरती या आयपीएस अधिकारी असल्या स्वत:ही एक डॉक्टर आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना कोरोनाविषयक उपाययोजना राबवण्यास मदत झाली. त्यांना भेटणाऱ्या व्यक्तींना त्या कोणती औषधे घ्यावीत, याचाही सल्ला देत. मास्क न घालणाऱ्यांना त्या त्याचे दुष्परिणाम समजावून सांगत. यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे.
आरती सिंह या 2006 मध्ये आयपीएस झाल्या. लेडी सिंघम म्हणूनही त्यांना ओळखले जाते. नक्षलग्रस्त गडचिरोली भागातही त्यांनी चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. त्यांचे पतीही आयपीएस अधिकारी आहेत. आरती या पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधतात. यामुळे कर्मचाऱ्यांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.
डॉ.आरती सिंह यांच्या कामगिरीची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. सुळे यांनी म्हटले आहे की, अमरावती येथे कार्यरत असणाऱ्या आयपीएस अधिकारी डॉ. आरती सिंह या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करत असणाऱ्या प्रयत्नांची देशविदेशातील माध्यमे दखल घेत आहेत. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
डॉ. आरती सिंह या स्वतः डॉक्टर आहेत. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी त्या सदैव प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रबोधन करतात. याशिवाय ज्या लोकांना मास्क विकत घेणे परवडत नाही त्यांच्यासाठी त्यांनी मास्क देखील उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान त्यांनी मालेगाव येथे अतिशय उत्तम सेवा दिली होती.त्यांची ही कर्तव्यदक्षता सर्वांसाठी आदर्श आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.