औरंगाबादः अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पीयो यांनी जगभरात फेमस केलेला मोदी है तो मुमकिन है.. हा डायलॉग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगाबाद येथे कार्यक्रमात बोलताना मारला . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिक सिटीच्या हॉलचे लोकार्पण करण्यात आले यावेळी ते मराठवाड्यासाठीच्या महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्पाला लागणाऱ्या निधीबाबत बोलत होते .
शेंद्रा एमआयडीसीतील ऑरिक हॉल आणि राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज औरंगाबादेत आले होते. ऑरिक हॉलचे मोदींच्या हस्ते उद्धाटन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात, दोन रात्र न झोपता मोदीजी आजच्या कार्यक्रमाला आल्याचा उल्लेख केला. डीएमआयसीच्या माध्यमातून मोदींनी महाराष्ट्राला विशेषत मराठवाड्याला दिलेली ही मोठी भेट आहे. या निमित्ताने जगभरातील मोठे उद्योग इथे येऊ पाहत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ऑरिक सिटीच आज राष्ट्राला लोकार्पण ही महाराष्ट्राला मोदींनी दिलेली मोठी भेट आहे. डीएमआयसी अंतर्गत ऑरिकसाठी मोदींजीनी मोठा निधी उपलब्ध करून दिला. मराठवाड्याच्या इतिहासात खऱ्या अर्थाने आज औद्योगिक क्रांतीचा दिवस असल्याचा गौरवोल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी केला.
देशातील सर्वात चांगले ऑटो क्लस्टर मराठवाड्यातील उद्योजकांनी इथे उभे केले असून याच ऑरिक सिटी व औरंगाबाद येथून समृध्दी महामार्ग देखील जात असल्यामुळे भविष्यात औरंगाबाद आणि जालना उद्योगांसाठी मॅगनेटीक ठरेल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, मराठवाड्यात गेल्या पाच पैकी चार वर्ष दुष्काळ आहे. या भागातील दुष्काळ कायमचा मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी गुजराथच्या धरतीवर आम्ही देखील कोकणातील पावसाचे समुद्रात जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरीच्या माध्यमातून मराठवाड्यात वळवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शिवाय वॉटरग्रीडच्या माध्यमातून 64 हजार किलोमीटरची पाईपलाईन टाकून शुध्द केलेले पाणी आम्ही घराघरात पोहचवणार आहोत.
त्यांनी सांगितले, वीस हजार कोटींच्या या कामाची सुरूवात औरंगाबाद आणि जालन्यातून करण्यात देखील आली आहे. वॉटरग्रीड जेव्हा सुरू करण्याचा विचार आम्ही मांडला तेव्हा आम्हाला अनेकांनी सांगितले, ही खर्चिक योजना आहे, एवढा पैसा कुठून आणणार? तेव्हा मी त्यांना सांगितले "मोदी है तो मुमकीन है' असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारने आपल्याला वॉटरग्रीडसाठी पाहिजे तेवढा निधी देण्याची तयारी दाखवली असल्याचे सांगितले.
पंकजा मुंडे यांनी बचतगटांचे मोठे जाळे राज्यात निर्माण केल्याचे सांगतांनाच महिला बचत गटांना दिलेले कर्ज शंभर टक्के परत केले गेले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महिला बचतगटांचे कौतुक केले. त्यामुुळे महिला बचतगटांना बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.