देवेंद्र फडणवीसांची राजीनाम्याची घोषणा; थोड्याच वेळात राज्यपालांना भेटणार

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आमच्याकडे बहुमत उरलेले नाही. त्यामुळे काही वेळातच मी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आताच झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
Devendra Fadanavis To Resign as CM
Devendra Fadanavis To Resign as CM

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आमच्याकडे बहुमत उरलेले नाही. त्यामुळे काही वेळातच मी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आताच झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, ''महाराष्ट्रात आपल्या सर्वांना माहिती आहे निवडणुकीत जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिलं. आणि महाराष्ट्रात भाजपला सर्वात जास्त १०५ जागा दिल्या. आम्ही शिवसेनेबरोबर लढलो. पण हा जनादेश भाजपला होता कारण भाजपने लढलेल्या जागांपैकी ६७ ते ७० टक्के जागा आम्ही जिंकलो. शिवसेना ४०-४२ टक्के जागा जिंकली. या जनादेशाप्रमाणे जनतेच्या मनातले सरकार स्थापनेचा आम्ही प्रयत्न केला. जे काही ठरलेच नव्हते. शिवसेनेला नंबर गेम समजला म्हणून त्यांनी बार्गेन सुरु केले. कधीही शिवसेनेला भाजप मुख्यमंत्रीपद द्यायचे ठरले नव्हते. अमित शहा यांनी हे नेहमी स्पष्ट केले होते. न ठरलेल्या बाबींचा बाऊ करुन आम्ही कुणाही सोबत जाऊ अशी धमकी भाजपला दिली. त्यावर भाजपने तात्विक भूमीका मांडली की जे ठरले ते देऊ.''

ते पुढे म्हणाले ''आमच्याशी चर्चा करण्याऐवजी ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करत होते. मातोश्रीवरुन बाहेर न पडणारे अनेकांच्या पायऱ्या झिजवत होते. आम्हाला राज्यपालांनी बोलावले. पण शिवसेना बरोबर नसल्याने आम्ही सत्तास्थापनेला नकार दिला. नंतर शिवसेनेने आपल्याकडे संख्या आहे असे सांगून हसे करून घेतले. नंतर राष्ट्रवादीनेही नकार दिला. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर तीन जण मिळून सरकार स्थापणार अशा चर्चा सुरु होत्या. पण सरकार स्थापन होत नव्हते. कारण तीन भिन्न पक्ष, ज्यांचा आयडियालाॅजीचा कुठलाही संबंध नाही, हे समान कार्यक्रम तयार करत होते. भाजपला दूर ठेवा एवढाच हा समान कार्यक्रम होता. ते बाकी काही करु शकले नाहीत.''

''अजित पवार यांनी सत्तास्थापने करता सहकार्य करायचे ठरवले. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पत्र दिले. त्या आधारे आम्ही सरकार स्थापन केले. आज न्यायालयाचा निर्णय आला. त्यानंतर अजित पवारांनी मला सांगितले मी राजीनामा देतो. त्यामुळे आमच्याबरोबरही बहुमत उरलेले नाही. भाजपने पहिल्या दिवशीपासून भूमीका घेतली होती की कुणाचे आमदार फोडणार नाही. घोडेबाजार करणार नाही. त्यामुळे मी काही वेळातच राज्यपालांकडे राजीनामा देणार आहे," असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com