हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची भगिनी वाय. एस. शर्मिला यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तेलंगणमध्ये 'राजन्ना राज्यम' म्हणजे राजशेखर रेड्डी यांचे सरकार आणण्याचा निर्धार शर्मिला यांनी केला आहे. त्या राजशेखर रेड्डी यांच्या जन्मदिनी ८ जुलैला पक्ष स्थापन करतील.
तेलंगणमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, शर्मिला यांनी आतापासूनच जोरदार तयारी केली आहे. शर्मिला यांच्या पाठीशी त्यांच्या मातोश्री वाय.एस. विजयालक्ष्मी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. विजयालक्ष्मी यांनी म्हटले आहे की, तेलंगणमधील जनतेची सेवा करण्याचा निर्णय माझ्या मुलीने घेतला याचा मला आनंद आहे. माझी मुलगी तिच्या पित्याप्रमाणेच खंबीर आहे.
काल (ता.९) हैदराबाद ते खम्मम अशी मोठी रॅली शर्मिला यांनी काढली होती. नंतर त्यांनी खम्मम येथे जाहीर सभा घेतली. दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांनी मात्र, या सर्व घडामोडींपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. शर्मिला यांच्या पक्षाचे बोधचिन्ह, ध्वज आणि विचारधारा या सर्व गोष्टींची घोषणा ८ जुलैलाच होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात मागील काही महिन्यांपासून मतभेद आहेत. जगममोहन रेड्डी यांनी बहिणीला वायएसआर काँग्रेस पक्षात कोणतेही महत्त्व न देता दूर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर शर्मिला या मागील काही महिन्यांपासून वायएसआर यांच्या समर्थकांशी चर्चा करीत होत्या. काँग्रेस पक्षातील वायएसआर यांचे समर्थकही त्यांच्या संपर्कात आहेत. वायएसआर पक्षाने
शर्मिला यांनी त्यांचे वडील आंध्र प्रदेशचे (अविभाजित) माजी मुख्यमंत्री दिवंगत राजशेखर रेड्डी यांच्या समर्थकांची नुकतीच बैठक घेतली होती. ही बैठक त्यांनी त्यांच्या लोटस पाँड येथील निवासस्थानी घेतली होती. वायएसआर आणि विजयम्मा यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी पक्षाची घोषणा होण्याची शक्यता आधी वर्तविण्यात आली होती. लोटस पाँड येथे उभारलेल्या फलकावर जगनमोहन रेड्डी यांचे छायाचित्र नव्हते. यावरुन त्या आगामी काळात जगनमोहन यांच्याविरोधात पावले टाकू शकतात, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. दरम्यान, शर्मिला यांनी पक्षशिस्तीचे उल्लंघन केले आहे, अशी टीका वायएसआर काँग्रेसने केली आहे.
शर्मिला यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे बोलताना जगनमोहन रेड्डी यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले होते की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे माझे मोठे बंधू आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद माझ्यामागे आहेत. आंध्रात ते स्वतःचे काम पुढे नेत आहे. म्हणूनच तेलंगणमध्येही राजन्नाचे राज्य आणण्याची गरज असल्याने मी येथे नवा पक्ष स्थापन करीत आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.