नवी दिल्ली : जुनी वाहने भंगारात काढण्याच्या (Vehicle Scrapping Policy) धोरणाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली. या अंतर्गत जुनी आणि फिटनेस नसलेली वाहने भंगारात काढली जाणार आहेत. या धोरणामुळे देशातील वाहन क्षेत्रात अमूलाग्र बदल होतील, असा दावा सरकारकडून केला जात आहे. यातून 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, 35 हजार नवीव रोजगार निर्माण होतील, असेही सरकारचे म्हणणे आहे.
व्हेईकल स्कॅपिंग पॉलिसी काय आहे?
जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणांतर्गत अनफिट आणि प्रदूषण करणारी वाहने पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने वापरातून रद्द केली जातील. ही वाहने भंगारात काढण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यात ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स आणि नोंदणीकृती वाहने भंगार सुविधा उभारल्या जातील.
धोरणाची नियमावली काय?
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने आणि 20 वर्षांपेक्षा जुनी खासगी वाहने यात येतील. या वाहनांची फिटनेस तपासणी केली जाईल. या तपासणीत नापास होणारी वाहने भंगारात काढली जातील. या धोरणांतर्गत कमी प्रदूषण, इंधन बचत करणारी आणि अधिक सुरक्षित वाहने वापरण्यास प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी एप्रिल 2023 पासून जड व्यावसायिक वाहनांची तपासणी बंधनकारक करण्यात येईल. इतर प्रकारच्या वाहनांसाठी टप्प्याटप्प्याने जून 2024 पासून ही तपासणी सुरू होईल.
वाहनमालकाला काय होणार फायदा?
या धोरणानुसार, जुने वाहन भंगारात काढून नवीन वाहन घेणाऱ्या वाहनमालकाला सवलती दिल्या जातील. जुन्या वाहनांचे स्कॅपिंग सर्टिफिकेट दाखवून रोड टॅक्सवर 25 टक्के परतावा मिळेल आणि वाहनांच्या नोंदणी शुल्कही माफ होईल.
जीएसटीमध्ये 5 टक्के सवलत?
रस्ते व परिवहन मंत्रालय सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना याबाबत परिपत्रक पाठवणार आहे. जुने वाहन भंगारात काढून नवीन वाहन घेणाऱ्या वाहनमालकाला जीएसटीत 5 टक्के सवलत दिली जाईल. जीएसटीवर यासाठी परतावा मिळावा, असा आग्रह गडकरी यांनी अर्थ मंत्रालयाकडे धरला आहे. परंतु, हा निर्णय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे.
व्हिंटेज गाड्यांचे काय होणार?
व्हिंटेज गाड्यांना या धोरणातून वगळण्यात आले आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत. या गाड्यांबाबत लवकरच नवी नियमावली जाहीर केली जाणार आहे.
या धोरणानुसार 1 कोटींहून अधिक वाहने भंगारात काढली जातील. यामुळे 23 ते 25 टक्के प्रदूषण कमी होईल. नवी वाहने रस्त्यावर येतील. जुन्या वाहनांचे स्टील, इतर धातू, रबर याचा पुनर्वापर करण्यावर भर आहे. या धोरणामुळे ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये भारताचा क्रमांक जगात उंचावेल, असे सरकारचे म्हणणे आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.