ममतांनी मतदारसंघ बदलला...डाव्यांच्या सत्तेला सुरूंग लावला तेथूनच लढणार!

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. ऐन रणधुमाळीत ममता बॅनर्जींनी मतदारसंघ बदलला आहे.
west bengal cm mamata banerjee will contest election from nandigram
west bengal cm mamata banerjee will contest election from nandigram

नंदिग्राम : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणूक नंदिग्राममधून लढण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ त्यांनी सोडला असून, तेथील जनतेची माफी मागितली आहे. नंदिग्राममधूनच दहा वर्षांपूर्वी डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ममतांनी सत्तांतर घडवले होते. 

ममतांनी आज नंदिग्राममध्ये प्रचारसभा घेत त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या वेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. नंदिग्राम हा तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नंदिग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. 

‘वॉशिंग पावडर भाजप’ असा नारा देत ममतांनी येथून निवडणूक लढविली तरी भवानीपूरकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिले. आज जाहीर सभेतच ममतांनी थेट उपस्थित जनसमुदायाला साद घालताना ‘मी येथूनच निवडणूक लढवू का?’ अशी विचारणा केली. त्यावर उपस्थितांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. केंद्रामध्ये रेल्वेमंत्री असताना नंदिग्राममध्ये केलेल्या विकासकामांचा पाढाही त्यांनी वाचून दाखविला. 

राज्यामध्ये 2007 मध्ये डाव्यांची सत्ता असताना नंदिग्राममधील रसायन कारखान्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या आंदोलनानंतर 2011 मध्ये डाव्या आघाडीच्या ३४ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागून सत्तांतर झाले होते. त्यावेळी ममतांच्या विजयात नंदिग्रामचे महत्व अनन्यसाधारण होते. ममतांचे नंदिग्रामशी भावनिक नातेही आहे. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 14 लोक ठार झाले होते तेव्हा सर्वप्रथम घटनास्थळी पोचणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. या वेळी पोलिसांनी ममतांना रुग्णालयात जाण्यापासून रोखण्यात आले होते. 

नंदिग्राम हे माझ्यासाठी शुभ ठिकाण आहे. माझा पक्ष सोडून जे जात आहेत त्यांची मला फारशी चिंता नाही. जेव्हा तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा यापैकी कोणीही माझ्यासोबत नव्हते, असेही ममतांनी सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com