नंदिग्रामचा गोंधळात गोंधळ : जिंकले कोण ममतादीदी की सुवेंदू अधिकारी?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयासहसत्ताधारी तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा बहुमतासह सत्ता स्थापन करणार आहे.
west bengal chief minister mamta banerjee battle in nandigram against suvendu adhikari
west bengal chief minister mamta banerjee battle in nandigram against suvendu adhikari

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 212 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपचे अधिकारी सुवेंदू अधिकारी यांच्यात नंदिग्राममध्ये थेट लढत होती. ही लढत ममता जिंकल्या असल्या तरी भाजपने विजयाचा दावा केला आहे. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने मतमोजणी पूर्ण झाली नसल्याचा खुलासा तृणमूलने केला आहे.   

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 212, भाजप 78, डावे 1 व इतर 1 असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्तास्थापन करतील, असे चित्र दिसत आहे. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. 

ममता आणि सुवेंदू अधिकारी यांच्या नंदिग्राममधील सामना रंगतदार ठरला होता. ममतांनी त्यांचा पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडून त्यांनी नंदिग्राममधून निवडणूक लढवली होती. अतिशय अटीतटीच्या लढतीत अधिकारींना त्यांच्या बालेकिल्ल्यात ममतांनी धूळ चारली. भाजपने मात्र, नंदिग्राममध्ये सुवेंदू अधिकारींचा विजय झाल्याचा दावा केला आहे.  

यावर ममतांनी म्हटले आहे की, नंदिग्रामची काळजी करु नका. मी नंदिग्रामसाठी खूप मोठा लढा दिला आहे. हे ठीक आहे. नंदिग्राममधील जनतेचे जो काही कौल असेल तो आम्हाला मान्य आहे. मी तो मान्य करेन. याबद्दल मला काही वाटत नाही. आम्ही राज्यात 221 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असून, भाजप ही निवडणूक हरला आहे. 

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे. 

एक्झिट पोलपेक्षाही मततांची कामगिरी सरस 
एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालच्या लढतीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गड राखण्यात यशस्वी ठरतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, तृणमूलला 149 जागा मिळवून ममता बॅनर्जी सत्ता ताब्यात ठेवतील. याचवेळी भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊन पक्षाला 116 जागा मिळतील. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला 16 जागा मिळतील. 

निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुका घेण्यात आल्या. यात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत झाल्या आहेत. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला  होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com