लखनौ : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) भाजपने (BJP) पुन्हा सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) माळ पुन्हा एकदा पुष्करसिंह धामी यांच्याच गळ्यात पडली आहे. विशेष म्हणजे धामी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आता धामी यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांच्याही बाबतीत असाच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मौर्य यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे त्यांचे भवितव्य अनिश्चित मानले जात आहे.
मौर्य यांचा सिराथू मतदारसंघात पराभव झाला होता. आता उत्तराखंडमध्ये पराभूत झालेले धामी मुख्यमंत्री बनल्याने मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. मौर्य हे ओबीसी नेते आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याकडे पक्ष नेतृत्वाचा कल आहे. मौर्य यांचा सराथू मतदारसंघातून तब्बल 6 हजार 841 मतांनी पराभव झाला होता. समाजवादी पक्षाच्या पल्लवी पटेल यांनी सराथूमधून विजय मिळवित मौर्य यांना पराभवाची धूळ चारली होती. मौर्य यांच्या पराभवामागे भाजपमधील अंतर्गत राजकारण असल्याची चर्चाही रंगली होती. मौर्य हे सध्या विधान परिषदेवर असून, त्यांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात कायम ठेवून त्यांना पुन्हा विधान परिषदेवर घेतले जाईल, असे दिसत आहे.
उत्तराखंडमध्ये हरलेला नेता बनला मुख्यमंत्री
उत्तराखंडमध्ये भाजपने 70 पैकी 47 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले. परंतु, त्यांचा खातिमा मतदारसंघात पराभव झाला. ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि ज्येष्ठ नेते सत्पाल महाराज हे शर्यतीत होते. या चौघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री निवडीसाठी आमदारांची बैठक पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह आणि पक्षाच्या नेत्या मीनाक्षी लेखी या केंद्रीय निरीक्षक म्हणून बैठकीला हजर होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी धामी यांचे नाव निश्चित करण्यात आले.
उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्रिपदी तिरथसिंह रावत आले होते. त्यांना चार महिन्यांतच जुलैमध्ये मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. नंतर त्याच महिन्यात पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी झाली. यानंतर उत्तराखंडमध्ये लगेचच विधानसभा निवडणूक होत असल्याने तोपर्यंत मुख्यमंत्री कोण नेमावा, असा तिढा नेतृत्वासमोर होता. अखेर धामी यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवण्यात आली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.