केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट केलं..नंतर डिलिट केलं..तरी व्हायचं ते नुकसान झालंच!

केंद्रीय मंत्र्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
union minister of state babul supriyo creates controversy
union minister of state babul supriyo creates controversy

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च  ते 29 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. आता केंद्रीय मंत्री व भाजप नेते बाबूल सुप्रियो यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी मुलींबद्दल केलेल्या विधानावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट डिलिट करुनही गदारोळ सुरूच आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले होते. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

बंगालमध्ये बाहेरील कोण नको तर आपलीच मुलगी पुन्हा सत्तेत हवी, अशी घोषणा तृणमूलकडून देण्यात येत आहे. या घोषणेला जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहून भाजप धास्तावल्याचे चित्र होते. यावर भाजप नेते व गायक बाबूल सुप्रियो यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. सुप्रियो हे केंद्रात पर्यावरण व वन विभागाचे राज्यमंत्री आहेत. 

बेटी पराया धन होती है, असे ट्विट सुप्रियो यांनी केले होते. या ट्विटमध्ये ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र होते आणि त्याशेजारी मी बंगालची मुलगी आहे, असे लिहिले होते. त्याखाली अमित शहांचे छायाचित्र होते आणि त्याशेजारी बेटी पराया धन होती है, असे लिहिले होते. हे ट्विट भाजपच्या असनसोल युनिटने सुरवातीला केले होते. नंतर बाबूल यांनी ते शेअर करीत 'कर ही देंगे इस बार विदा' असे म्हटले होते. या ट्विटवरुन सोशल मीडियावर सुप्रियो यांना लक्ष्य करण्यात येऊ लागले. यानंतर बंगालची मुलगीच पुन्हा राज्यात हवी, असा ट्रेंड ट्विटवर सुरू झालाय. त्यामुळे त्यांनी ट्विट डिलिट केले. मात्र, त्यांच्या ट्विटमुळे व्हायचे ते नुकसान आधीच झाले होते. 

यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. महिलांना कमी लेखणारी भाजपची मानसिकता सुप्रियो यांनी दाखवून दिली आहे, अशी टीका होत आहे. बंगालच्या महिला व बाल कल्याण मंत्री डॉ. शशि पंजा यांनी म्हटले आहे की, देशातील महिलांच्या स्थितीबद्दल मला खूप चिंता वाटत आहे. तुमच्यासारखे लोकप्रतिनिधीच जर अशी मानसिकता ठेवत असतील तर महिलांचे काय होणार? भाजप नेत्यांच्या मनात महिलांना कमी लेखण्याची भावना आहे हे समोर आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com