उपसभापतींच्या आसनावर आक्रमण करून कोणते राजकारण करीत आहात? स्मृती इराणींचा संतप्त सवाल

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण तापले आहे. या विधेयकावरुनसत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये आता जोरदार जुंपली आहे.
union minister smriti irani slams opposition on rajya sabha chaos
union minister smriti irani slams opposition on rajya sabha chaos

नवी दिल्ली : देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. ही बहुचर्चित दोन कृषी विधेयके आज राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर झाली. या विधेयकांवरुन सरकार विरुद्ध विरोधक असा वाद पेटला आहे. आता सरकारच्या वतीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी या मुद्द्यावरुन विरोधकांना लक्ष्य केले आहे. 

कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक 2020 ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. आज त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. सभापतींसमोरील हौद्यात जाऊन सदस्यांनी विधेयकाविरोधात घोषणा दिल्या. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करुन घेण्यात सरकारला यश आले. राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.  

कृषी विधेयकांना विरोध करीत विरोधकांनी उपसभापतींसमोरील हौद्यात आणि सभागृहात ठाण मांडले होते. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयकांवर उत्तर देण्यास सुरूवात केल्यानंतर गोंधळ आणखी वाढला. कृषी मंत्र्यांचे उत्तर गोंधळामुळे सदस्यांना ऐकायला जात नव्हते. अखेर काही मिनिटांतच त्यांनी उत्तर संपल्याचे जाहीर केले. 

यामुळे विरोधी सदस्यांनी उपसभापती हरिवंशसिंह यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. याचवेळी काही सदस्यांनी उपसभापतींसमोर हौद्यात जाऊन रूलबुक फाडले. तर काही सदस्यांनी उपसभापतींच्या दिशेने रुलबुक फेकले. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेचे कामकाज एक दिवसासाठी तहकूब करावे, अशी मागणी केली. मात्र, उपसभापतींनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेतले. या वेळी विरोधकांची घोषणाबाजीही वाढली. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करण्यात आली. या वेळी विरोधी पक्षांतील अनेक सदस्य आणि भाजपचे सदस्यांमध्ये जुंपल्याचे चित्रही आज पाहायला मिळाले.  

या विधेयकांना मंजुरी मिळाली असली तरी त्यावरुन उठलेला गदारोळ कायम आहेत. राज्यसभेचे उपसभापती हरिवंशसिंह यांनी आजच्या कामकाजात पक्षपातीपणा केला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. उपसभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी दाखल केला आहे. यामुळे हा विधेयकांवरुन सुरू झालेला वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

राज्यसभेत आज झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू झाली. या बैठकीला उपसभापती हरिवंशसिंह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. आज राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. याचबरोबर हरिवंश यांच्याविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली आहे.

सरकारच्या वतीने विरोधकांना उत्तर देण्यासाठी स्मृती इराणी मैदानात उतरल्या आहेत. त्या म्हणाल्या की, उपसभापतींच्या आसनावर अशा प्रकारे आक्रमण करणे खरोखरच वेदनादायी आहे. देशातील राजकारणाच्या चौकटीत असे वर्तन बसते का? केवळ उपसभापतीच नव्हे तर देशाचे उपराष्ट्रपती बसतात त्या आसनासमोरील माईक तोडणे योग्य आहे का? हे आपल्या देशाच्या राजकारणाला शोभा देणारे नाही. सभागृहाचे नियम असलेले रुलबुक फाडणे हे विरोधकांच्या कोणत्या राजकीय संस्कृतीत बसते याचे उत्तर त्यांनी द्यावे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com