नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सुरवात झाली असली तरी या लशीच्या सुरक्षिततेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. कोरोना लस घेतलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना तीन दिवसांत समोर आल्या आहेत. सरकारने मात्र, या दोघांच्या मृत्यूचा लसीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. आता डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारीच कोरोनाची लस नाकारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीपासून देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. या वेळी मोदींनी देशवासींयाशी संवाद साधला होता. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे, असल्याचा संदेश मोदींनी दिला होता. तीन कोटी लोकांना लस मोफत देण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून 3 लाख 80 हजार जणांना ही लस देण्यात आली आहे. यातील 580 जणांना लस दिल्यानंतर त्रास जाणवला असून, सात जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. याचबरोबर लस घेतलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मृत्यूचा लसीकरणाशी कोणताही संबंध नाही.
आता आरोग्य कर्मचारीच कोरोना लस घेण्यास नकार देऊ लागले आहेत. यामुळे सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. कोरोना विरोधातील लढ्यात आघाडीवर असणारे डॉक्टर, नर्स आणि इतर घटकांनी लस घेण्यास टाळाटाळ करु नये, असे सरकारने म्हटले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि निती आयोगाच्या सदस्यांनीही कोरोना लशीसाठी पात्र असलेल्या व्यक्तींना लसीकरणासाठी आवाहन केले आहे.
निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही.के.पॉल म्हणाले की, लस बनवण्यासाठी मोठे परिश्रम घेण्यात आले आहेत. आपले आरोग्य सेवक विशेषत: डॉक्टर, नर्स जर कोरोना लशीला नकार देत असतील तर ही खेदाची बाब आहे. कोरोनाची साथ उद्या कोणते रुप धारण करेल हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्ही कृपया ही लस घ्या.
या लशीचे प्रतिकूल परिणाम आणि त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे दावे निराधार आहेत. भारतात वापरण्यात येणाऱ्या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. काही प्रतिकूल परिणाम झाल्यास सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. आरोग्य सेवकांनी लस घेण्यास टाळाटाळ करु नये, असे आवाहन डॉ. पॉल यांनी केले आहे.
केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. या आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा समावेश असेल.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.