सुवेंदू अधिकारी अडचणीत...उमेदवारी रद्द करण्याचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात

पश्चिम बंगालमधील नंदिग्राममधील लढत सर्वांत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे असताना सुवेंदू अधिकारींची उमेदवारी अडचणीत आली आहे.
tmc demands bjp leader suvendu adhikari nomination cancellation
tmc demands bjp leader suvendu adhikari nomination cancellation

कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदिग्राममधून मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात सुवेंदू अधिकारी भाजपकडून रिंगणात उतरले आहेत. मात्र, अधिकारी हे आता अडचणीत आले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती सादर केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारीच रद्द करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे. 

तृणमूल काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाला निवेदन दिले आहे. अधिकारी यांनी नंदिग्राममध्ये न राहताही तेथील खोटा पत्ता निवडणूक अर्ज भरताना दिला आहे. अधिकारी हे नंदिग्राममधील नंदनायकबार या गावात मागील सहा महिन्यांपासून राहिलेले नसून, ते तेथील स्थायी रहिवासीही नाहीत. त्यामुळे त्यांचे नंदिग्राममधील मतदार यादीतील नाव रद्द करावे. अधिकारींचे हल्दिया येथील मतदार यादीतही नाव आहे. अधिकारींनी हल्दीया येथील मतदार यादीतील नाव काढून ते नंदिग्राम नोंदवावे, असा अर्ज केला होता. परंतु, यासाठी त्यांना खोटा पत्ता दिला होता. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी तृणमूलने केली आहे. 

ममता बॅनर्जी या नंदिग्राममधून लढणार आहेत. यावेळी त्यांनी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडला आहे. नंदिग्राममधूनच दहा वर्षांपूर्वी डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ममतांनी राज्यात सत्तांतर घडवले होते. आता या मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी भाजपलाही सुरूंग लावण्याची तयारी केल्याची चर्चा होती. भाजपने ममतांच्या विरोधात सुवेंदू अधिकारी यांना उतरवले आहे. 

ममतांनी नंदिग्राममधून लढण्याची तयारी मागील काही दिवसांपासूनच सुरू केली होती. नंदिग्राम हा तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नंदिग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता नंदिग्राम हा मतदारसंघ तृणमूल व भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा ठरणार आहे. दोन्ही नेते मातब्बर असल्याने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जातील.

ममतांनी जाणीवपूर्वक या मतदारसंघाची निवड केली आहे. राज्यामध्ये 2007 मध्ये डाव्यांची सत्ता असताना नंदिग्राममधील रसायन कारखान्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या आंदोलनानंतर 2011 मध्ये डाव्या आघाडीची सत्ता गेली होती. त्यावेळी ममतांच्या विजयात नंदिग्रामचे महत्व अनन्यसाधारण होते. ममतांचे नंदिग्रामशी भावनिक नातेही आहे. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 14 लोक ठार झाले होते तेव्हा सर्वप्रथम घटनास्थळी पोचणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com